लातूरसाठी कॉंग्रेसपुढे भाजपाचे मोठे आव्हान 

sambaji-patil
sambaji-patil

मुंबई : माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची कर्मभूमी म्हणून राज्याच्या राजकारणात ओळखल्या जाणारा लातूर जिल्हा हा कॉंग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला मानला जात होता. परंतु राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर लातूर शहरातील वारेही बदलायला लागले असून, उद्या 19 एप्रिल रोजी होणाऱ्या लातूर महापालिका निवडणुकीत जनता कोणाच्या पारड्यात माप टाकते याकडे लक्ष लागले आहे.
 भाजपाचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि कॉंग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले असून, कोणत्याही परिस्थितीत भाजपाला बहुमत मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी सचिवामार्फंत या निवडणुकींवर नजर ठेवली असल्याचे समजते. 

लातूर ,चंद्रपूर आणि परभणी महापालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये शत प्रतिशत भाजप असे यश मिळविण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपाकडून सुरु असला तरी, लातूर महापालिका निवडणुका जिंकणे हा आता भाजपातील नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न बनला आहे. लातूर महापालिकेच्या 70 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळेल, असा विश्‍वास वाटत आहे. 

लातूर जिल्हा आणि शहरी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अनेक वर्षे प्रलंबित आहे. लातूर महापालिकेची सत्ता कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. 2012 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसच्या 49, राष्ट्रवादीच्या 13, शिवसेना 6 आणि अपक्ष 2 असे संख्याबळ मिळाले आहे. पाण्याबरोबर कचऱ्याची समस्या जटील आहे. महापालिकेच्या हद्दीत 18 हजार लिकेज असल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. त्यातून पाणीकपातीचे संकट उभे राहिले, असा आरोप भाजपाकडून केला जात आहे. 

लातूर महापालिकेत भाजपाने आतापर्यंत खाते उघडले नसले तरी, राज्यात निर्माण झालेल्या भाजपाच्या वाऱ्याबरोबर लातूर महापालिकेची सत्ता मिळविण्यात भाजपा यशस्वी होईल, असा विश्‍वास भाजपा नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे सामान्य शेतकरी कुटुंबियांप्रमाणे शहरी भागातील नागरिकांकडून कॉंग्रेसला कितपत स्वीकारले जाईल, ही कॉंग्रेसचे अमित देशमुख यांची परिक्षा आहे. . विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात लातूर शहरात नागरी सुविधा आणण्याच्या दृष्टीने कामे झाली होती. परंतु, विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर आता त्यांचे पूत्र अमित देशमुख हे आमदार असले तरी, गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्य जनतेशी किती नाळ जूळवून घेतली हे लातूर महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

 लातूर जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता आणण्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना यश आले आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची सूत्रे संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे सोपविण्यात आली असली तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खाजगी सचिवामार्फंत या निवडणुकीवर बारिक नजर ठेवली आहे. शहरातील मुस्लिम बहुल भागातील मते भाजपाला मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री शहनवाज हुसेन यांना प्रचारासाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळातील मास लिडर आणि मराठवाड्यातील कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा समाज लातूर शहरात असतानाही पंकजा मुंडे यांना प्रचारासाठी का बोलावले नाही अशी कुजबूज भाजपाच्या गोटात सुरु आहे.
 
तसेच लातूरमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्यावेळी लातूर शहराला रेल्वेतून पाणीपुरवठा करण्यात आला होता. जर शहनवाज हुसेन यांना मुस्लिम मतांसाठी प्रचारात उतरविण्यात आले तर सुरेश प्रभू यांच्याकडे का विचारणा करण्यात आली नाही. याचा अर्थ भाजपाला यश मिळेल, अशी खात्री असलेला भाजपाचा एक गट श्रेय दुसऱ्याला मिळू नये यासाठी प्रयत्न करत असावा, अशी चर्चा भाजपा वर्तुळात केली जात आहे. 

दुसऱ्याबाजूला कॉंग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी प्रचारात रस घेतल्याचे दिसून आले. विलासराव देशमुख असताना अशोकराव आणि विलासराव यांच्यातील शीतयुद्धामुळे अशोकरावांनी कधी लातूर शहरात प्रचार केला नव्हता. परंतु, पक्षाचे हित लक्षात घेवून अशोकराव चव्हाण प्रचारात उतरल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com