लातूर : राज्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून काही दिवस होत नाहीत तोच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टिकास्त्र सोडले जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री व पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे शिवसेनेचा ढाण्या वाघ शेळी बनला आहे, अशी जोरदार टीका केली आहे.
महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपचे दोन मते फुटल्याने बहुमत असताना सुद्धा भाजपची सत्ता हातून गेली होती. काँग्रेसचा महापौर झाला तर भाजपचा बंडखोर काँग्रेसच्या मतावर उपमहापौर झाला. याची पुनरावृत्ती जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत होवू नये याची काळजी घेण्यासाठी श्री. दानवे येथे आले आहेत. सोमवारी या पदासाठी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेवरही भारतीय जनता पक्षाचे बहुमत आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षात मोठी बंडाळी झालेली आहे. यातून अहमदपूर, उदगीर सारख्या जागा पक्षाला गमवाव्या लागल्या आहेत.
पक्षात अंतर्गत नाराजी आहे. हे लक्षात घेवून श्री. दानवे येथे आले होते. त्यांनी सर्वांशी चर्चा केली. मते जाणून घेतली. जिल्हा परिषदेवर भाजपचीच सत्ता राहील, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी श्री. ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ''खाते वाटप होत नाही तोच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला. पुन्हा परत घेतला. शिवसेना दडपणाला बळी पडत आहे. हे सरकार जास्त काळ टिकणारे नाही. शिवसेनेचा ढाण्या वाघ तर शेळी बनला आहे,'' अशी टीका त्यांनी श्री. ठाकरे यांच्यावर केली. यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.