'त्यांना' मंत्रिपद महत्त्वाचे वाटले : राधाकृष्ण विखे

"समन्यायी पाणीवाटप कायद्याचे विधेयक मांडू नका, असे सांगूनही आमच्या शेजारच्या मित्रांनी ऐकले नाही. त्यांना शेतकऱ्यांपेक्षा स्वत:चे मंत्रिपद महत्त्वाचे वाटले. या कायद्याच्या विरोधात मोठा संघर्ष करावा लागला,'' अशी टीका गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
Radhakrishna Vikhe - Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe - Balasaheb Thorat

संगमनेर (नगर) : "समन्यायी पाणीवाटप कायद्याचे विधेयक मांडू नका, असे सांगूनही आमच्या शेजारच्या मित्रांनी ऐकले नाही. त्यांना शेतकऱ्यांपेक्षा स्वत:चे मंत्रिपद महत्त्वाचे वाटले. या कायद्याच्या विरोधात मोठा संघर्ष करावा लागला,'' अशी टीका गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

आश्वी बुद्रुक व निमगाव जाळी येथे झालेल्या महायुतीच्या प्रचारसभेत विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, "जिरायती भागाच्या पाणीप्रश्नासाठी (स्व.) ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी संघर्ष केला. राज्यात कॉंग्रेस आघाडीच्या मुख्यमंत्र्यांपुढे अनेक वेळा पाणीप्रश्नाचे प्रस्ताव मांडले. मात्र, त्याचे गांभीर्य कोणालाही वाटले नाही. उलट मंत्रिमंडळातील आमच्या मित्रांनी समन्यायी पाणीवाटप कायद्याचे विधेयक मांडून जिल्ह्यावर अन्याय केला. या कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध होत असतानाही, जिल्ह्यातील पाण्यापेक्षा त्यांनी स्वत:चे मंत्रिपद टिकविण्यात धन्यता मानली.''

''राज्यात कधी नव्हे, इतकी कॉंग्रेसची बिकट अवस्था झाली आहे. दिवसागणिक पक्ष सोडून लोक निघून जात आहेत. कॉंग्रेसचे नेते आता राज्यात प्रचार करताना कुठेही दिसत नाहीत. प्रदेशाध्यक्षांचे हेलिकॉप्टर संगमनेरातच मुक्कामी आहे. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील पेन्शन योजना थकलेल्या नेत्यांसाठीच तर नाही ना? राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येणार, यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे,'' असे विखे पाटील म्हणाले. थोरातांचे कट्टर समर्थक व संगमनेर शेतकी संघाचे संचालक भाऊसाहेब जऱ्हाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शेतकी संघाच्या इमारतीच्या कामात पत्रिका वाटण्यापासून कष्ट घेऊनही उपेक्षा झाल्याने हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

कॉंग्रेसची संख्या चारवर येईल
यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, "स्वत:ला 'जाणता राजा' म्हणवणाऱ्यांनी पाणीप्रश्नाबाबत सर्वांनाच खेळविले. मागील तीन दिवस प्रचारानिमित्त जिल्ह्यात येत असलेल्या या नेत्यांनी पाणीप्रश्नावर कोणतेही भाष्य केलेले नाही. दुष्काळी भागासाठी पाणीयोजना विकसित करणे शक्‍य होते; पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने 80 आमदारांची संख्या 40 वर आली. आताच्या प्रदेशाध्यक्षांच्या काळात ती संख्या केवळ 4 वर येईल.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com