कॉंग्रेससोबत आघाडी होऊ नये म्हणून भाजपकडून दबावतंत्राचा वापर : प्रकाश आंबेडकर

कॉंग्रेससोबत आघाडी होऊ नये म्हणून भाजपकडून दबावतंत्राचा वापर : प्रकाश आंबेडकर

अकोला : देशाच्या राजकारणात सध्या दबाबतंत्राचा नवीन फंडा सुरू झाला आहे. अगदी कुटुंबातही हे राजकीय दबावतंत्र वापरले जात आहे. नात्या गोत्यातील माणसांना सत्तेत नेऊन बसविण्याचा हा राजकीय उद्देश त्यामागे आहे. देशभर कॉंग्रेसशी कोणत्याही पक्षाची युती होऊ नये म्हणून दबावतंत्राचा वापर होत आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे सुतोवाच त्या उद्देशानेच आहे. जमीन घोटाळ्यात एकट्या रॉबर्ड वड्राचा सहभाग नसून संपूर्ण कुटुंबाचीच चौकशी झाली पाहिजे, असे वक्तव्य करून भाजपतर्फे दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी भाजप व आरएसएसवर गुरुवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत केला. 

समझोत्याचे राजकारण केले तर जेलची हवा नक्की, असे घृणास्पद राजकारण सध्या देशात सुरू असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. 1990 च्या लोकसभेमध्ये मी गेलो तेव्हा असेच आरोप बेच्छुटपणे केले जात होते. त्यात अनेक मंत्री, नेते संपले. आतासुद्धा ब्लॅकमेलिंगचेच राजकारण सुरू आहे. त्यात काही बळी पडले तर काही खंबीरपणे उभे आहेत, असे आंबेडकर म्हणाले. कॉंग्रेससोबत देशभर कुठेही युती होऊ नये, अशीच स्थिती भाजप व संघ परिवाराकडून निर्माण केली जात असल्याचा आरोप करून आंबेडकर यांनी भाजपच्या या नितीचा निषेध केला. 

देशात फॅसिस्ट सरकार येऊ पाहते. नोटबंदीपूर्वी आरबीआयने सांगितलेल्या संभाव्य धोक्‍यानंतरही नोटबंदी जाहीर करण्यात आली. राफेल घोटाळ्याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयामध्ये दस्तऐवज सादर करणाऱ्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचा खटला दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. यानिमित्ताने मी न्यायालयाला सांगू इच्छितो की, देशात राजेशाही संपली आहे. एखादा व्यक्ती नोकरदार असेल, तर त्याला त्याचे निमयम पाळावे लागते; मात्र तो या देशाचा नागरिकही आहे, हे विसरून चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयात त्याने दाखल केलेले दस्तऐवज हा त्याचा अधिकार आहे. त्यात गोपनियतेचा भाग नाही. बीजेपी त्याचे राजकारण करीत आहे, त्याचा मी निषेध करीत असल्याचे आंबेडकरांनी सांगितले. 

जमीन घोटाळ्यात संपूर्ण कुटुंब सहभागी असल्याचे पुरावे होते, ते आधी का दिले नाही. स्वतःला वाचविण्यासाठी कुणाला तरी ईडीसमोर पाठविले जात आहे. आता कारवाई करू, असे वक्तव्य करून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न होत असल्याचे आंबेडकर म्हणाले. या दबावतंत्राचा वापर माझ्यावरही झाला होता. पीएमच्या कटात मला मुख्य आरोपी करण्याचा प्रयत्न झाला होता. शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर माघार घेणे, विखे पाटलांचा मुलगा भाजपमध्ये जाणे, रणजितसिंह मोहिते पाटलांचा मुलगा मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असणे, हे सर्व दबावाचे बळी असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला. 

नाना पटोले डमी उमेदवार 
कॉंग्रेसने नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोले यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र पटोले हे कॉंग्रेसचे डमी उमेदवार आहे. आरएसएसच्या दबावतंत्राचा तो एक भाग असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला. 

उमेदवार यादी उद्या होणार जाहीर 
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व मतदारसंघातील उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

भारिप-बमसं लोकसभेनंतर वंचित आघाडीत विलिन 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या रिपब्लिकन चळवळीचे पुनरुर्जीवन करून भारिप-बमसंची स्थापना चार दशकांपूर्वी करण्यात आली होती. भारिप म्हणून राजकारणात पक्ष विस्ताराला येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता भारिप-बमसंच लोकसभेनंतर वंचित बहुजन आघाडीत विलिन करण्यात येणार असल्याची माहिती आंबेडकर यांनी यावेळी दिली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com