मंत्रिपदासाठी मी आणि संजय शिरसाट एकाच गाडीतून मुंबईला जायचो - संदीपान भुमरे

मंत्रिपदासाठी मी आणि संजय शिरसाट एकाच गाडीतून मुंबईला जायचो - संदीपान भुमरे

औरंगाबाद : जिल्ह्याला मंत्रिपद मिळावे म्हणून मी आणि संजय शिरसाट दोघे एकाच गाडीतून मुंबईला जायचो. मी केबिनमधून बाहेर आलो की शिरसाट जायचे. दोघांच्याही भेटीगाठी झाल्या की एकाच गाडीतून आम्ही परत यायचो, मी मंत्री झालो म्हणून ते नाराज आहेत असा अपप्रचार विरोधकांकडून केला जातो. पण त्यात काहीच तथ्य नाही. दोघांनीही मंत्रीपदासाठी प्रयत्न करायचे असे आमचे ठरले होते. आमचा खूप जुना दोस्तांना आहे असे सांगत रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी मंत्रीपदाच्या शर्यतीचा रंजक किस्सा सांगितला. 

औरंगाबाद येथील सातारा-देवळाई या आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील विकासकामांचे उद्‌घाटन आज संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. भुमरे आणि शिरसाट हे शिवसेनेतील जुने आणि एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जातात जिल्ह्यातील सहा आमदारांपैकी मंत्रीपद कुणाला द्यायचे यावरून भुमरे-शिरसाट यांच्यात मोठी स्पर्धा होती. मंत्रिपद मिळावे यासाठी शिरसाट आणि आपण कसे प्रयत्न केले याचे गंमतीशीर वर्णन संदीपान भुमरे यांनी आपल्या भाषणात केले. 

भुमरे म्हणाले, जिल्ह्यातून कुणाला मंत्री करायचं याची जेव्हा मुंबईत मातोश्रीवर चर्चा सुरू होती. तेव्हा संजय शिरसाट आणि मी दोघेही फिरत होतो. एकाच गाडीतून मुंबईला जायचो, मी उध्दव साहेबांशी बोलून आलो, की शिरसाट जायचे. दोघांनीही प्रयत्न केले. मला मंत्रिपद मिळाले म्हणून आमच्या दोघांच्या मैत्रीत कुठेही कटुता आली नाही. आम्ही दोघही आमदार नव्हतो तेव्हापासूनचा आमचा दोस्ताना असल्याचेही भुमरे यांनी सांगितले. शिवसेनेत एकनिष्ठतेला खूप महत्व आहे, तुम्ही पक्षाशी इमान राखून काम करत असाल तर पक्ष त्याची दखल घेतोच. मला मंत्रीपद तेही कॅबिनेट मिळेल असे कधीच वाटले नव्हते, फार फार तर राज्यमंत्री करतील असे वाटले होते. पण उध्दव साहेबांनी थेट कॅबिनेट मंत्री केले, हे फक्त शिवसेनेतच घडू शकते असे सांगताना संजय शिरसाट हे देखील लवकरच मंत्रालयात माझ्या बाजूला येतील अशा शुभेच्छा देखील भुमरे यांनी शिरसाट यांना दिल्या. 

निवडणुकीत मी पेपरच वाचला नाही.. 
संजय शिरसाट तुम्हाला विधानसभा निवडणुकीत जसा त्रास झाला, आरोप- प्रत्यारोप झाले तसे माझ्यावरही झाले. माझ्या मतदारसंघातील माऱ्होळा गावात मला लोकांनी येऊ दिले नाही अशा बातम्या त्यावेळी प्रसिध्द झाल्या होत्या. पण या गावातून मला नव्वद टक्के मतदान झाले. मग लोकांचा मला विरोध होता, तर एवढे मतदान कसे झाले ? तेव्हा अशा बातम्याकडे लक्ष देऊ नका. 

निवडणुकीच्या काळात मी पेपरच वाचले नाही, कारण लोकांचा बुध्दीभेद करणाऱ्या बातम्याच जास्त असायच्या. एका दैनिकाच्या पत्रकाराने मला फोन केला आणि म्हणाला, आमच्या पेपरला महत्व दिले नाही तर तुम्हाला महागात पडेल. मी म्हटंल तुम्हाला काय छापायचं ते छापा, तुमच्या लिहिण्याने मी निवडून येतही नाही, आणि पडतही नाही, आमचे काही दोन नंबरचे धंदे नाहीत अशा शब्दांत आपण त्या पत्रकाराला फटकारल्याचेही भुमरे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com