भुमरे, शिरसाट यांची शपथविधी सोहळ्याकडे पाठ

भुमरे, शिरसाट यांची शपथविधी सोहळ्याकडे पाठ

औरंगाबाद : आयात आणि विधान परिषदेवर निवडून गेलेल्यांनाच मंत्रिपद बहाल केले जात असल्याचा आरोप करत मराठवाड्यातील अनेक शिवसेना आमदारांनी नाराजीचा सूर आळवला होता. मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा देखील अनेकांनी केली. पण प्रसारमाध्यमांवर याची जोरदार चर्चा होऊ लागताच आम्ही नाराज नाही, शपथविधी सोहळ्याला जाणार असे सांगणाऱ्या बहुतांश शिवसेना आमदारांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे, संजय शिरसाट हे मुंबईत शपथविधी सोहळा सुरू असतांना आपापल्या मतदारसंघातच ठाण मांडून होते. 

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला राज्याच्या राजकारणात विशेष महत्व आहे. गेल्या तीस वर्षापासून हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघापैकी शहरातील पश्‍चिम, मध्य, तर ग्रामीण भागातील गंगापूर, वैजापूर, कन्नड आणि पैठण युतीमध्ये शिवसेनेकडे आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यामुळे अनेक मतदारसंघातील सध्याचे चित्र बदललेले आहे. उदाहरणार्थ शिवसेनेच्या गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब निवडूण आलेले आहेत. शहरातील पश्‍चिम मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे कायम राखला आहे. गेल्या निवडणुकीत संजय शिरसाट यांनी भाजपच्या मधुकर सावंत यांचा पराभव करत दुसऱ्यांदा विजय मिळवला होता. 

पैठण विधानसभा मतदारसंघातून 2009 चा अपवाद वगळता शिवसेनेचे संदीपान भुमरे चारवेळा निवडून आले आहेत. सातत्याने निवडूण येत असतांना देखील मराठवाडा किंवा औरंगाबाद जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी त्यांच्या नावाचा कधी विचार केला गेला नाही. विधान परिषद किंवा ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांनाच मंत्रिपद देण्याची परंपरा यावेळी देखील कायम राखली गेली. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा व्हायच्या तेव्हा औरंगाबाद जिल्ह्यातून संदीपान भुमरे, संजय शिरसाट यांची नावे पुढे यायची. प्रत्यक्षात जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार झाला तेव्हा मात्र शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन कॅबिनेट मंत्रिपदी राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले जयदत्त क्षीरसागर व विधान परिषदेतील आमदार प्रा. तानाजी सांवत यांची निवड करण्यात आली. 

सहाजिकच या निर्णयामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. पण ती उघडपणे न दाखवता शपथविधीकडे पाठ फिरवून व्यक्त करण्याचा मार्ग भुमरे, शिरसाट यांनी स्वीकारल्याचे बोलले जाते. शपथविधीकडे पाठ फिरवण्याचे कारण विचारण्यासाठी भुमरे, शिरसाट यांच्यांशी संपर्क साधला परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. शपथविधी सोहळ्याला दांडी मारत या दोघांनीही आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. 

भाजपकडून बेरजेचे राजकारण... 
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर अंतर्गत गटबाजी उफाळून आली होती. शिवसेनेच्या 34 व्या वर्धापनदिन सोहळ्यात ती दिसून आली. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या हकालपट्टीची चर्चा सुरू असतांनाच शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात वाढ करत त्यांना बळ दिले. संघटना मजबूत करण्यासाठी घेतलेला हा निर्णय योग्य असला तरी यातून खैरे यांचे खच्चीकरण झाल्याचा संदेश देखील त्यांच्या समर्थकांमध्ये गेला. याच फटका आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला बसू शकतो. 

दुसरीकडे भाजपने मात्र अशा परिस्थीती बेरजेचे राजकारण करत शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी विधानसभा आणि त्यानंतर होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपने अतुल सावे यांना राज्यमंत्री करत त्यांचे हात बळकट केले आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वी शहरातील रस्ते, पाणी, कचरा हे प्रश्‍न सोडवण्यासाठी भरघोस निधी द्यायचा, निवडणुकीत त्याचे श्रेय घ्यायचे असे बेरजेचे राजकारण भाजपने केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com