मुंबई : कोरोना विषाणूचा प्रवाशांना संसर्ग होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. ताफ्यातील 3500 हून अधिक बसगाड्यांच्या बाह्य आणि अंतर्गत स्वच्छतेसाठी काळजी घेतली जात आहे. त्यासाठी मुंबईतील सर्व 24 आगारांमध्ये रोज निर्जंतुकीरण करूनच बस रस्त्यांवर आणल्या जात आहेत.
पश्चिम रेल्वेप्रमाणे बेस्ट उपक्रमानेही बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आगारांमध्ये मशीनद्वारे बसगाड्या बाहेरून धुतल्या जातात. कामगारांकडून दररोज रात्री बसच्या आतील भागाची रसायनांनी स्वच्छता केली जात आहे. दिवसभर बससेवा सुरू असल्याने रात्री आगारात उभ्या असलेल्या बसगाड्यांची देखभाल, स्वच्छता केली जाते.
बसमधील आसने, खिडक्यांच्या काचा, पायऱ्या, चालकाची जागा आदी सर्व भागांची स्वच्छता केली जाते. फेऱ्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बसच्या निर्जंतुकीकरणाचा मुद्दा नेहमीच चर्चेला येतो. शहरातील दमट हवेचा परिणाम होत असल्याने बसगाड्या नेहमी स्वच्छ ठेवल्या जातात. आता कोरोना संसर्गामुळे निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली.
संसर्ग होऊ नये यासाठी स्वयंसेवी संस्थांनी बस वाहकांना हातमोजे, सॅनिटायझर पुरवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी बेस्ट प्रशासनाने निधी देऊन वाहक व चालकांची काळजी घ्यावी, अशी मागणी काही जागरुक नागरिकांनी केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.