भाजप शांतिगिरी महाराजांना डावलणार?; खैरेंविरोधात मराठा उमेदवार देणार! 

चंद्रकांत खैरे यांच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी शांतिगिरी महाराज यांना रसद पुरवायची, भाजपचा स्वतंत्र मराठा उमेदवार देऊन शिवसेनेच्या बालेकिल्याला सुरुंग लावण्याचे प्रयत्न आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून केले जाणार आहेत.
भाजप शांतिगिरी महाराजांना डावलणार?; खैरेंविरोधात मराठा उमेदवार देणार! 

औरंगाबाद : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल (ता.23) मुंबईत केली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात भाजप कुठे आणि कोणते उमेदवार देणार यावर खल सुरु झाला आहे. वीस वर्षांपासून शिवसेनेकडे असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला धूळ चारण्यासाठी चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात भाजपकडून मराठा उमेदवार उतरवला जाण्याची शक्‍यता आहे. 

औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडे अकरा इच्छुक उमेदवार असल्याचा दावा स्थानिक नेत्यांकडून केला जातोय. पंरतु शिवसेनेची मतदारसंघावर असलेली मजबूत पकड, विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना चारही निवडणूकीत मिळालेले लाखांवरचे मताधिक्‍य पाहता भाजपला खैरेंच्या तोडीचा उमेदवार द्यावा लागेल, याची जाणीव पक्षाला आधीपासूनच आहे. 

भाजपकडून अनेक नावांची चर्चा घडवून आणली जात असली तर उमेदवार देतांना जातीचे समीकरणच महत्वाचे ठरणार आहे. त्यातच शिवसेनेने निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा वर्षभर आधीच केल्याने भाजप आता कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. 

वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महंत शांतिगिरी महाराज यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करतानांच आपल्याला विचारणा होत असल्याचा गौप्यस्फोट नुकताच केला होता. त्यानंतर भाजपमध्ये चिलबिचल सुरु झाली. शांतिगिरी महाराजांना भाजपकडून उमेदवारीची कुठलेही आश्‍वासन दिले नसल्याचे भाजपचे नेते आता सांगतायेत. 

त्यामुळे शांतिगिरी महाराजांच्या खाद्यांवर बंदूक ठेवून भाजप खैरेंवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जाते. भाजपकडून लोकसभेसाठी मराठा उमेदवारच द्यायचा, याचा निर्णय जवळपास निश्‍चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेले आणि अचानकपणे भाजपमध्ये सक्रीय झालेले माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार जयसिंगराव गायकवाड हेच भाजपचे उमेदवार असतील, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांचे नाव मराठा उमेदवार म्हणून चर्चिले जात असले तरी त्यांच्या तुलनेत जयसिंगराव गायकवाड यांचे पारडे जड असल्याचे बोलले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जयसिंगराव गायकवाड यांनी केलेले कार्य, आणि संसदीय राजकारणाचा अनुभव पाहता भाजपकडून त्यांनाच मैदानात उतरवले जाऊ शकते अशी चर्चा जोर धरू लागली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com