शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना-एमआयएम सोबत...

कोरोनाचे संकट ओढावलेले असतांना त्यात अतिवृष्टीची भर पडली. हातचे पीकं, फळबागा आणि शेतजमीन डोळ्यासमोर पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशावेळी राजकारण, मतभेद बाजूला सारून लोकप्रतिनिधी एकत्र आले. अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील हे जिल्ह्यातील दोन मोठे नेते आहेत. दोघांनीही शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याला आपले प्राधान्य असल्याचे म्हटले आहे.
shivsena-mim news aurangabad
shivsena-mim news aurangabad

औरंगाबाद ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, पिकं, फळबागा, शेतजमीन देखील वाहून गेली आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीचा तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळा आर्थिक मदत करण्याची गरज आहे. अशावेळी एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले पक्ष आणि त्यांचे नेते देखील एकत्र येत असल्याचे चित्र आज पहायला मिळाले.

शिवसेना आणि एमआयएम हे दोन पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनाचा पराभव झाल्यापासून तर हा विरोध टोकाला गेला आहे. असे असले तर कन्नड तालुक्यातील शेतपिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार व एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे एकत्र आले होते. शेतात जाऊन पाहणी आणि आढावा बैठकीत देखील या दोघांमध्ये चांगला संवाद दिसून आला.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा, अशी मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी सरकारकडे लावून धरली होती. कृषीमंत्री दादा भुसे यांनी नुकतीच मराठवाड्यात येऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली, तसेच पंचनाम्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. जिल्ह्यातील शेती विषयक आढावा घेत त्यांनी सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांना मदत केली जाईल असे आश्वासन दिले होते.

अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघात प्रशासनातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पंचनामे करून घेतले. त्यांनतर आज त्यांनी कन्नड तालुक्यात आढावा बैठक घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत पंचनामे करायला लावले. विशेष म्हणजे खासदार इम्तियाज जलील, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे देखील त्यांच्या सोबत होते.

देशावर आणि राज्यावर गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाचे संकट ओढावलेले असतांना त्यात अतिवृष्टीची भर पडली. हातचे पीकं, फळबागा आणि शेतजमीन डोळ्यासमोर पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशावेळी राजकारण, मतभेद बाजूला सारून लोकप्रतिनिधी एकत्र आले. अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील हे जिल्ह्यातील दोन मोठे नेते आहेत. दोघांनीही शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याला आपले प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. 

कृषी विधेयकावर ठोस भुमिका घ्या..

आढावा बैढक आणि प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना इम्तियाज जलील यांनी सत्तार यांच्या समोरच शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. कृषी सुधारणा विधेयकाला शिवसेने लोकसभेत पाठिंबा दिल्याचे सांगत खिचडी सरकार असले की अशी फजिती होते, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेने कृषी विधेयका संदर्भात आपली भूमिका मोकळेपणाने मांडावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

इम्तियाज यांनी शिवसेनेवर टिका केली असली तरी त्यांचे आणि सत्तार यांचे संबंध चांगले आहेत. एका वृतवाहिनीच्या कार्यक्रमात हे दोघे एकत्र असतांना औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील माझ्या विजयात सत्तार यांचा देखील वाटा होता, असे इम्तियाज यांनी जाहीरपणे सांगतिले होते. तेव्हा सत्तार यांनी फक्त हात जोडून स्मितहास्य केले होते. आज आढावा बैठकीच्या निमित्ताने  हे दोघे पुन्हा एकत्र आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com