औरंगाबाद ः राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृतांचे प्रमाण पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘, ही मोहिम हाती घेतली आहे. औरंगाबाद जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने ही मोहिम यशस्वीरित्या राबवून कोरोनाला रोखण्यासाठी १ ते २३ आॅक्टोबर दरम्यान विविध उपक्रम घेण्यात येणार आहे. वार्ड व गावपातळीवर शपथ घेऊन शिवसैनिक या मोहिमला सुरूवात करणार असल्याचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले.
कोरोनापासून आपल्या कुटुंबाचे व स्वतःचे रक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे, या संकल्पनेतून मुख्यमंत्र्यांनी ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी‘, ही मोहिम संपुर्ण राज्यात सुरू केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात ३५ हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असून नऊशे पेक्षा जास्त जणांचे बळी या महामारीने घेतले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही महत्वाकांक्षी मोहिम जिल्ह्यात यशस्वी करण्याच्या दृष्टीने शिवसेना कामाला लागली आहे.
या मोहिमे संदर्भात माहिती देतांना अंबादास दानवे म्हणाले, २ आॅक्टोबर रोजी वार्ड व गावागावात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘, ही शपथ घेऊन आम्ही कामाला लागणार आहोत. २३ आॅक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत गाव आणि शहरातील चौकाचौकात उभे राहून जे लोक मास्क वापरत नाहीत त्यांना मास्क देण्यात येणार आहेत. या शिवाय रिक्षाचालक, फेरीवाले ज्यांचा लोकांशी जास्त संपर्क येतो त्यांना साबण वाटप करत वारंवार हात स्वच्छ धुण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
सहा महिन्याच्या काळात लोकांना मदत करतांना काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या, त्यापैकी एक म्हणजे कोरोना झालेली व्यक्ती ही मानसिकदृष्ट्या खचते, त्यांना हिंमत आणि आधार देण्यासाठी ‘ माझे कुटुंब माझे मनस्वास्थ', हा उपक्रम देखील आम्ही हाती घेतला आहे. या अतंर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे-शिसोदे यांचे आॅनलाईन व्याख्यान देखील ठेवण्यात आले आहे. जेणेकरून कोरोना रुग्णांच्या मनातील भिती नाहीशी होऊन त्याला या आजारावर मात करण्यासाठी बळ मिळेल. तसेच जनता-प्रशासन-जबाबदारी आणि खबरदारी या विषयावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे देखील आॅनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.
वाफेचे मशीन, अंध विद्यालयात मास्क, साबण, सॅनिटायजरचे वाटप आणि जागतिक विद्यार्थी दिनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘, या विषयावर निंबध स्पर्धा देखील घेण्यात येणार असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. या शिवाय वार्ड व गावनिहाय कोरोना युध्दात अविरत सेवा बजावणाऱ्या ९ कोरोनायोध्या नवदुर्गांचा सन्मान शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.