जालना ःमराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद मांडण्यात आपण कमी पडल्यानं मराठा समाज नाराज झालाय.आमच्या मराठ्यांनी कुणाचा रेडा मारला ते कळत नाही.आमच्या मराठ्यांच्या विरोधात सगळेच असतात.८० टक्के मराठा हा गरीब आहे.मराठा समाजाची ग्रामीण भागात वाईट परिस्थिती आहे.सगळ्यात जास्त मराठे राज्यकर्त्यांमध्ये असूनही मराठा समाजाला कुणी वाली राहिला नाही, असे म्हणत आम्ही राजकीय नेत्यांचे झेंडेच घेऊन फिरायचं का असा सवाल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला.
जालना येथे आयोजित मराठा जागर परिषदेत पाटील बोलत होते. प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना पाटील म्हणाले, आर्थिक विकास महामंडळ आणि आरक्षण हे दोन प्रश्न मार्गी लागल्यास मराठा समाज विकासाकडे वाटचाल करेल. आर्थिक निकषावर आरक्षण मिळत नाही. आमचे मराठा लोकप्रतिनिधी झोपलेत का? काही टाळकी एकत्र येऊ शकतात. तर सर्व पक्षीय मराठा खासदार व आमदारानी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण करावा.
आरक्षणाच्या लढाईस यश मिळाल्यास आनंदच होईल. पण जर एसईबीसीचे आरक्षण मिळत नसेल तर आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असे मतही नरेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लोकप्रतिनिधी दिसत नाहीत
कोल्हापूर : मराठा आरक्षण हा समतेचा लढा असून, तो न्यायालयीन लढाईच्या जोरावर जिंकावा लागेल, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (ता. 25 ऑक्टोबर) कोल्हापूर येथे केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लोकप्रतिनिधी दिसत नाहीत, असा टोला लगावत त्यांनी लोकप्रतिनिधींनी त्यांचे कार्यक्रम बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन केले.
सकल मराठा कोल्हापूरतर्फे आयोजित दसरा मराठा मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी मराठा आरक्षणाची आवश्यकता स्पष्ट करताना गरीब मराठा समाजाची स्थिती हलाखीची असल्याचे सांगितले. शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात मेळाव्याचे आयोजन केले होते.
संभाजीराजे म्हणाले, ""राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला १९०२ रोजी आरक्षण दिले होते. त्यात मराठा समाजाचादेखील समावेश होता. महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या मोठी असून, ८५ टक्के मराठा समाज गरिबीशी झुंज देत आहे. अनेक आव्हाने त्यांच्यासमोर उभी आहेत.
समाजातील मुला-मुलींना शिक्षण व नोकरीत स्थान मिळविताना संघर्ष करावा लागत आहे. एकेक गुणासाठी त्यांनी अहोरात्र अभ्यासात झोकून द्यावे लागत आहे. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी कायदेशीर लढाई लढावी लागेल.''
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.