परभणी ः मराठवाडा ही साधू -संताची भूमी आहे, येथील लोक शांत व सयंमी आहेत. पण हाच मराठवाडा चळवळीचे केंद्रही आहे हे लक्षात घ्यावे. ७० : ३० टक्केचा फॉर्मुला रद्द करण्यासाठी उभारण्यात आलेले जन आंदोलन हे उग्ररुप धारण करण्याआधीच हा फॉर्मुला रद्द करावा अन्यथा हे आंदोलन मराठवाडाभर उभारले जाईल, असा इशार परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी दिला. या संदर्भातील निवेदन पालकमंत्री नवाब मलिक यांना देण्यात आले. जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.
वैद्यकीय प्रवेशाचे ७० : ३० टक्के सुत्र रद्द करावे या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (ता.१५) स्वातंत्रदिनाच्या ध्वजारोहणाआधी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर पालक मंत्री नवाब मलिक यांना सर्वपक्षिय निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी (NEET) मध्ये पात्र झाल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रात विभाग निहाय सत्तर-तीस टक्के वाटा हे सूत्र राबविले जात आहे.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा असे तीन विभाग करून उर्वरित जागांसाठी ७० टक्के वाटा विभागाचा आणि ३० टक्के वाटा राज्याचा या सूत्रानुसार ही प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात येते. वास्तविक पाहता मराठवाडा विभागाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागात वैद्यकीय महाविद्यालये व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या किती तरी पटीने जास्त आहे. प्रचलित सूत्रामुळे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थांवर अनेक वर्षापासून अन्याय होत आहे.
उल्लेखनीय म्हणजे ७०:३० टक्के हे सूत्र देशातील इतर कुठल्याही राज्यात राबविले जात नसून या सूत्रामुळे दरवर्षी मराठवाड्यातील किमान ५०० विद्यार्थी डॉक्टर बनण्यापासून वंचित राहात आहेत. ही बाब शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाडा विभागाच्या दृष्टीने हानीकारक आणि अन्यायकारक आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियाही सामाजिक तथा जातीनिहाय आरक्षणानुसार राबविली जात असतांना पुन्हा विभागनिहाय आरक्षण कशासाठी ? हा प्रश्न संपूर्ण प्रवेश मराठवाड्याला गेल्या अनेक वर्षापासून सतावत आहे.
या सूत्रामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मरावाड्यातील विद्यार्थांना NEET मध्ये पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील विद्यार्थांच्या तुलनेत जवळपास ४० ते ५० गुण अधिक घ्यावे लागतात. ही बाब समानतेच्या तत्वाचा भंग करणारी आणि मराठवाड्यातील विद्यार्थांवर घोर अन्याय करणारी आहे. त्यामुळे हे सूत्र रद्द करावे या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री ज्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार होते त्या मार्गावर उभे राहून पालक व शिवसैनिकांनी निदर्शने केली.
या आंदोलनात कॉग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर, माजूलाला, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम, माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव, अर्जून सामाले, डॉ. मारुती हुलसुरे, अॅड. राजकुमार भांबरे, अतुल सरोदे, उध्दवराव देशमुख आदी सहभागी झाले होते.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.