लातूर ः लातूर लोकसभा मतदारसंघात रेल्वेसेवा अधिक विस्तारावी, रखडलेले प्रकल्प व कामे मार्गी लागावीत यासाठी भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी पुढाकार घेतला आहे. रेल्वेमंञी पियुष गोयल यांनी घेतलेल्या व्हीडीओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी लातूर जिल्हा तसेच लातूर लोकसभा मतदारसंघातील रेल्वेसंबधीचे प्रश्न व मागण्या रेल्वेमंत्र्यासमोर मांडल्या. लातूरच्या पिटलाईनसाठी मंजूर झालेले १४ कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही शृंगारे यांनी केली.
या कॉन्फ्रनसिंगमध्ये खासदार श्रृंगारे यांनी लातूर लोकसभा क्षेत्रात नवीन रेल्वे व रेल्वेविषयक कामे व प्रलंबित कामे यांची विस्ताराने माहिती दिली. लातूरच्या पिटलाईनसाठी मंजूर झालेले १४ कोटी रुपये लवकर मिळाल्यास पिटलाईनच्या कामाला सुरूवात होईल. तसेच नवीन रेल्वे गाड्या सुरु करता येणे शक्य होईल. तिरुपती- लातूर- तिरुपती मार्ग नवीन रेल्वे गुंटकल, वाडी, मंञालय रोड, गाणगापूर, गुलबर्गा, हुमनाबाद, बीदर उदगीर मार्गे सुरु करण्यात यावी. यामुळे लातूरकरांची अनेक वर्षापासूनची मागणी पुर्ण होईल.
मुंबईला जाणा-या व्यापारी, प्रवाशांची गैरसोय थांबवण्यासाठी लातूर ते मुंबई एक नवीन रेल्वे सुरु करण्यात यावी व रोज सुरु असलेल्या रेल्वेला साधारण डब्यांची संख्या वाढवावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नवीन हैदराबाद-मुंबई, बिदर-मुंबई व परळी-तिरुपती या रेल्वेची मागणी लातूरच्या जनतेतून होत आहे, त्या सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. लातूररोड-जळकोट-बोधन रेल्वेमार्गाचे सर्व्हेक्षण दक्षिण मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. १३५ किलोमीटरसाठी दोन हजार ४०९ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. या कामासाठी निधी उपलब्ध करून ते देखील लवकर सुरू करावे, अशी मागणी शृंगारे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.
दोन वर्षापासून प्रलंबित असेलेल्या लातूर रोड-अहमदपूर-लोहा-नांदेड रेल्वे मार्गास मंजूरी देऊन कामास सुरुवात झाल्यास या भागातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल. वडवळ नागनाथ येथील रेल्वे स्थानकावर एटीव्हीएमव्दारा तिकीटांची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, प्लाटफॉर्मची उंची वाढवावी, रेल्वे क्राँसींग व लूपलाईनसाठी ५ कोटी रुपये मंजूर असून काम अद्याप सुरु झालेले नाही ते लवकर सुरु करावे. जानवळ येथील रेल्वेगेट २०१० पासून बंद असून तेथे भूयारी मार्ग करणे आवश्यक आहे असल्याचे शृंगारे यांनी यावेळी सांगितले.
लातूरातून मोठ्या संख्येने भाविक तिरुपतीला जातात. तथापि या शहरातून थेट तिरुपतीस जाण्यासाठी रेल्वेचे सुविधा नाही. ही रेल्वे सुरू व्हावी अशी लातूरकरांची जुनी मागणी आहे. ती सुरू झाल्यास लातुरकरांची सोय होवून रेल्वेला चांगला महसूलही मिळेल. लातुरसाठी विशेष बाब म्हणून ही रेल्वे सुरू करावी, अशी आग्रही मागणीही खासदार शृंगारे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.