औरंगाबाद ः ‘मी चाळीस हजार जप केला, त्यामुळे भारतात अमेरिकेसारखी कोरोनाची परिस्थीती उद्भवली नाही‘, असा अजब दावा शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. जिल्हा गणेश महासंघाच्या गणेशोत्सव कार्यक्रमात बोलतांना खैरे यांनी हा दावा केल्यानंतर आता नव्या वादाला सुरूवात झाली आहे. खैरे हे देवावर श्रद्धा असणारे आणि सातत्याने जप, अनुष्ठान आणि धर्मिक विधी करण्यात अग्रेसर असतात. पण देवावरील विश्वास आणि श्रद्धेपोटी त्यांनी केलेली विधान कधी कधी अडचणीची ठरतात. त्या पैकीच एक म्हणजे त्यांनी वरील केलेले विधान.
गणेश महासंघाच्या कार्यालयाच्या उद्धाटन चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी आपल्या भाषणात खैरेंनी एक दावा केला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. मग त्यावरून संधी मिळेल त्यांने खैरे यांना चिमटा काढला. कोरोना काळात आपण केलेल्या मदत आणि कामाचा उल्लेख करत असतांना खैरेंनी ‘ मी चाळी हजार जप केला, म्हणून कोरोनाची परिस्थिती भारतात अमेरिके सारखी झाली नाही‘, असा दावा केला.
त्यानंतर त्यांनी चार महिने लोकांना केलेली अन्नधान्य, किराणा सामान, औषधी व कोरोना सेंटरमध्ये गेल्या महिनाभरापासून रुग्णांना दिले जात असलेले मोफत जेवण याची माहिती दिली. पण जप केल्यामुळे कोरोनाची परिस्थिती आपल्याकडे अमेरिके सारखी राहिली नाही या विधानाचा धागा पकडत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी खैरेंना चिमटा काढत तुमच्या मध्ये दैवी शक्ती आहे, आता तुम्ही गणपती बाप्पाला कोरोनामुक्तीसाठी साकडे घाला असे आवाहन केले.
कोरोनाच्या पाच महिन्याच्या काळात चंद्रकांत खैरे यांनी रस्त्यावर उतरून शिवसेनेला अपेक्षित असे काम करत असतांनाच आपला धार्मिकबाणा जपत रामरक्षा, सप्तशतीचे पाठ आणि दक्षिणमुखी मारोती मंदिरात ‘ओम उपसर्गानशेषांस्तु महामारीसमुदभवान! तथा त्रिविधमूल्पात महात्मयं शमयेन्मम' या मंत्राचे जपानुष्ठाण व ४४ हजार जप व होमहवन केले होते.
राज्यातील कोरोना परिस्थितीशी सरकार, आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, नर्स, पोलिस कर्मचारी यांच्यासह अनेकजण लढा देत आहेत, अशावेळी त्यांना अध्यात्मिक पाठबळ मिळावे, यासाठी आपण हे जपानुष्ठाण करत असल्याचे खैरे यांनी म्हटले होते. या शिवाय नागरिकांनी देखील कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपले रक्षण करण्यासाठी रामरक्षा आणि सप्तशतीचे पठण करावे, असे आवाहन केले होते.
कोरोनाच्या काळात धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे यंदा हनुमान जंयती साजरी करता आली नाही. तेव्हा देखील भद्रा मारोती आपले कोरोनापासून रक्षण करतील, असे मत खैरे यांनी व्यक्त केले होते. एकंदरित खैरे यांच्या या विधानामागे त्यांची भक्ती आणि श्रध्दा असली तरी यावरून ते टिकेचे धनी झाले आहेत. त्यांच्या या नव्या दाव्याने पुन्हा नव्या वादावाला आमंत्रण मिळाले आहे.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.