पन्नास रुपये किलोचा कापूस दहा रुपयाने विकण्याची वेळ ; पाहणी पथकासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

पन्नास रुपये किलोचा कापूस दहा रुपयाने विकण्याची वेळ ; पाहणी पथकासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

औरंगाबाद : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत आणि पिकांची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांनी आज आपल्या व्यथा मांडल्या. पन्नास रुपये किलो भावाने विकला जाणारा कापूस दहा रुपयाला विकावा लागत असल्याचे एका शेतकऱ्याने या पाहणी पथकाच्या निदर्शनास आणून दिले. राज्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या पावसाने खरीप हंगामातील पिक हातचे गेले. त्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले आहेत. त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय कृषी विभागाच्या पाहणी पथकाने आज जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड आणि कन्नड तालुक्‍यातील पीक परिस्थितीची पाहणी केली. 

पथकाचे प्रमुख केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरुपगल व त्यांच्यासोबत डॉ. के मनोहरण, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, जिल्हा कृषी अधिक्षक तुकाराम मोटे आदी अधिकारी पाहणी दौऱ्यात उपस्थित होते. फुलंब्री तालुक्‍यातील चौका येथे पथकाने भेट दिली तेव्हा, कांचनबाई नाना वाघ या शेतकरी महिलेने पथकाला आपल्या दिड एकर शेतातील मका पिकाचे पूर्णत: नुकसान झाल्याचे सांगितले. शेतात अजूनही पावसाचे पाणी साचल्यामुळे मका काढताच आला नाही हेही निर्दशनास आणून दिले 

कापूस, सोयाबीन, आले पिकाचेही नुकसान 
सिल्लोड तालुक्‍यात पथकाने पाहणी केली तेव्हा गेवराई शेमी, निल्लोड, वांजोळा गावातील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन आले पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे सांगितले. आले आणि दुबार पेरणी केलेल्या मक्‍यावर रोग पडल्याने हेही पिक हातचे गेल्याचे शेतकऱ्यांनी पाहणी पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले. भराडी गावात आलेल्या पथकाला शेतकऱ्याने सडलेला मका खाऊन जनावरे दगावल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. बावीस दिवस सतत पाऊस झाल्याने दोन एकरातील मका पूर्णत: पाण्यात भिजून खराब झाला होता. हा सडलेली मका जनावरांनी खाल्ला आणि त्यामुळे आमची जनावरे दगावली असे या शेतकऱ्याने पथकाला सांगितले. शेतातील पूर्ण पिक हातचे गेल्यामुळे सरकारने किमान बि-बियाणांचा आणि खताचा खर्च तरी द्यावा अशी मागणी एका शेतकरी महिलेने या पथकाकडे केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com