स्थापनादिनी भाजपचे औरंगाबादेत जोरदार शक्तीप्रदर्शन

स्थापनादिनी भाजपचे औरंगाबादेत जोरदार शक्तीप्रदर्शन

औरंगाबाद ः भाजपच्या स्थापनादिनानिमित्ताने शहरात गुरुवारी विविध कार्यक्रम घेण्यात आले. नुकत्याच झालेल्या जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात घवघवीत यश मिळाले. सर्वाधिक 23 सदस्य निवडून आल्याचा उत्साह आणि शिवसेनेच्या भूमिकेमुळे सत्तेला मुकावे लागल्याचे शल्य अशा दुहेरी वातावरणात भाजपने स्थापना दिवस साजरा केला. या निमित्ताने शिवसेनेचा बालेकिल्ला व शहराची राजधानी अशी ओळख असलेल्या गुलमंडीवर भाजपच्या वतीने सत्यनारायणाची पूजा घालत फटाक्‍यांच्या आतषबाजीत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम असलेल्या व मुंबईनंतर मराठवाड्यात सर्वप्रथम महापालिकेच्या रुपाने शिवसेनेला सत्ता मिळवून देणारे औरंगाबाद शहर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती तुटल्यानंतर हळूहळू ही परिस्थिती बदलू लागल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे बोट धरून चालायला शिकलेल्या भाजपची ताकद शहरात वाढली आहे. महापालिकेत एक आकडी असलेली भाजप नगरसेवकांची संख्या आजघडीला शिवसेनेच्या जवळपास पोचली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत तर भाजपने शिवसेनेला मागे टाकत मोठा भाऊ होण्याचा मान देखील पटकावला. शिवसेनेचा दबाव झुगारत जिल्ह्यात ताकद वाढवण्यासाठी शहराध्यक्ष तनवाणी यांनी शिवसेनेलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला शिवसेनेचे तीन नगरसेवक फोडत तनवाणी यांनी शिवसेनेला इशारा दिला होता. जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपला डावलल्यामुळे शिवसेनेला पुन्हा धडा शिकविण्याच्या तयारीत भाजपचे नेते आहेत. त्याची सुरुवात पश्‍चिम मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन करण्यात आली आहे. भविष्यात शिवसेनेला आणखी मोठे धक्के देण्याचा भाजपचा विचार आहे. 
सत्तेसाठी कायपण 
औरंगाबाद महापालिकेत गेल्या 25 वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. या सत्तेत शिवसेनेला नेहमीच मोठ्या भावाचा मान मिळाला. पण आकडे बदलायला लागताच भाजपने शिवसेनेवर कुरघोडी आणि संख्येच्या आधारावर सत्तेत वाटा मागायला सुरवात केली आणि तिथूनच युतीमध्ये बिब्बा पडायला सुरुवात झाली. सत्तेचा हव्यास दोन्ही बाजूंनी वाढला. शिवसेनेला अतिआत्मविश्‍वास नडला, तर भाजपने काळाची पावले ओळखत सावध भूमिका घेत पक्ष वाढवण्यावर भर दिला. 2014 च्या विधानसभेत युती तुटल्याचा फायदा भाजपला झाला. पूर्व मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे कॉंग्रेस, एमआयएम, शिवसेनेचा पराभव करुन विजयी झाले. तर मध्य मतदारसंघात शिवसेनेतून भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देऊन भाजपने शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांना पाडले. मध्य मधील पराभव तोही भाजपमुळे झाल्याने शिवसेना-भाजपमधील संबंध अधिकच बिघडले. महापालिकेत देखील संख्याबळ वाढल्याने भाजपने शिवसेनेवर गुर्रर्गुर करायला सुरुवात केली. संधी मिळेल तेव्हा एकमेकांचा अपमान व श्रेय लाटण्याची जणू दोघामंध्ये स्पर्धाच लागली. 
शिवसेनेने वचपा काढला 
जिल्हा परिषदेची निवडणूक स्वतंत्र लढल्यावर भाजपला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या. मुंबई महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने माघार घेत जिल्हा परिषदेत सेना भाजपला मदत करेल अशी अपेक्षा बाळगली होती. पण महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेवर भाजपकडून झालेली टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली होती. याचा बदला घेण्याचा निश्‍चय शिवसेनेने केला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपला रोखा असे आदेश देत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार बहाल केले. पाच वर्ष भाजप सोबत फरफटत जाण्यापेक्षा कॉग्रेसशी हातमिळवणी करणे शिवसेनेला योग्य वाटले. जालन्यात राष्ट्रवादीलाही सोबत घेतले. परिणामी दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये सर्वाधिक सदस्य असून देखील शिवसेनेच्या खेळीने भाजपला अध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले. जालना, औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपला एकही पद मिळणार नाही याची काळजी घेत वचपा काढला. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com