`कळमोडीच्या पाण्यासाठी आजी-माजी आमदारांनी खेडला झुलविले`

`कळमोडीच्या पाण्यासाठी आजी-माजी आमदारांनी खेडला झुलविले`

आंबेठाण : खेड तालुक्याच्या पूर्व भागाला कळमोडीचे पाणी मिळेल या आशेने आजी-माजी आमदारांनी झुलवत ठेवले आहे. तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडून एकमेकांच्या मिशांवर बोलायला आणि ऊनीधुनी काढून भांडायला यांना वेळ आहे. परंतु रखडलेल्या प्रश्नासाठी विधानसभेत बोलायला, भांडायला यांच्याकडे वेळ नाही. गरज पडल्यास आमदारकी पणाला लावायला यांच्यात हिम्मत नाही. एकमेकांचे हेवेदावे काढणाऱ्यानी तालुक्यात काय दिवे लावलेत, असा सवाल अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी वाफगाव ( ता. खेड ) येथे उपस्थित केला.

अतुल देशमुख पुढे म्हणाले की,आम्हाला कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही. परंतु विकास कामाबाबत नक्की विचारणा करणार आहे. पूर्व भागात प्यायला पाणी मिळत नसेल तर लोकप्रतिनिधी करतात काय? कारखानदारीत स्थानिकांना नोकऱ्या नाही. हे दोघे बहाद्दर पूर्व भागात गेले की सांगतात पश्चिम भागात मोठा निधी दिलाय आणि पश्चिम भागात गेले की सांगतात पूर्व भागात प्रचंड निधी दिलाय. परंतु या सर्व थापा आहेत. तालुक्यात पीएमआरडीएच्या माध्यमातून सर्वात पहिला रस्ता बुट्टेपाटील यांनी आणला असून चाकणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुन्हा नवीन दुसरा रस्ता पीएमआरडीएकडून मंजूर करून घेतला आहे.

यावेळी शरद बुट्टेपाटील म्हणाले की,मागील दहा वर्षात पाण्याचे नियोजन केले जात असताना माजी आमदार आणि आता पुण्याला पाणी जात असताना सद्याचे आमदार गप्प का आहेत. तालुक्यातील जनतेने दहा वर्षे गुंडगिरीचा आणि सद्याचे पाच वर्षे निष्क्रियतेचा असे दोन्ही काळ अनुभवले असल्याने सर्वांना आता परिवर्तनाची आस लागली असून ती अतुल देशमुख यांच्या रूपाने पूर्ण होणार आहे. आम्हाला या आजी-माजी आमदारांच्या हेवेदाव्यात न पडता तालुका सकारात्मक विचाराने पुढे न्यायचा आहे.

आमच्या शेजारचे शिरूर,आंबेगाव बागायती होतायेत परंतु आमच्या तालुक्यात तीन धरणे असूनही पूर्व भागात प्यायला पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. आजवर तालुक्यात असलेली खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा आम्हाला खंडित करायची आहे. तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांसाठी प्रसंगी वरिष्ठ नेत्यांशी वाद घालायची तयारी पाहिजे. परंतु या दोघांनी असे केल्यास तिकीट मिळणार नाही म्हणून गप्प बसण्याची भूमिका घेतली, अशी टीका त्यांनी केली.

एका तिकिटावर किती पिक्चर ? -
एखादे काम करायचे आणि पाच-दहा वर्ष त्याच्यावर मते मागायची सवय म्हणजे एका तिकिटावर अनेक पिक्चर पहायचे अशी आहे. आजवर दोन्ही लोकप्रतिनिधीनी सेझमध्ये किती नोकऱ्या लावून दिल्या हे सांगावे आणि त्यात फक्त धनधागड्याना ठेके दिले. चालू आमदारांचा वचक नाही म्हणून प्रश्न सुटले नाही, अशी टीका अमोल पवार यांनी केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com