पृथ्वीराज चव्हाणांनी पक्षातले स्थान तपासावे : अतुल भोसले समर्थकांची टीका

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे काँग्रेस पक्षातील स्थान काय आहे, त्यांना पक्षात किंमत राहिली आहे काय, त्याचा आधी खुलासा करावा, आणि मगच त्यांना राज्यात वेगळे स्थान आहे, असा आव आणावा, अशी टीका विठ्ठल रूक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या गटातील भाजप समर्थक नेत्यांनी केली.
पृथ्वीराज चव्हाणांनी पक्षातले स्थान तपासावे : अतुल भोसले समर्थकांची टीका

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे काँग्रेस पक्षातील स्थान काय आहे, त्यांना पक्षात किंमत राहिली आहे काय, त्याचा आधी खुलासा करावा, आणि मगच त्यांना राज्यात वेगळे स्थान आहे, असा आव आणावा, अशी टीका विठ्ठल रूक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या गटातील भाजप समर्थक नेत्यांनी केली. मलकापूर पालिकेचा व राज्याचा कारभार दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या आधी समजावून घ्याव्यात आणि मगच त्यांच्या कार्यकर्त्यांनी टिका करावी, अशीही टीका यावेळी करण्यात आली.

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थकांनी काल परवा पत्रकार परिषद घेवून भोसले गट कामाचे श्रेय लाटत आहे, असा आरोप केला होता. त्या विरोधात भोसले गटाने आज पत्रकार परिषद घेवून घणाघाती टिका केली. कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, अशोकराव थोरात, जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. श्यामबाला घोडके, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत बेछुट आरोप केले. यावेळी त्यांनी कामे मंजूर करण्यास केलेला पत्रव्यवहार दाखविला.

थोरात म्हणाले, "आमदार पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाड दक्षिणचे विद्यमान आमदार आहेत. मात्र ते आता राज्याचे मुख्यमंत्री नाहीत. साडेचार वर्षापूर्वीच राज्यात सत्ताबदल होवून पृथ्वीराज चव्हाण केव्हाच पायउतार झाले आहेत. याची कल्पना त्यांच्या तालुकाध्यक्षांना आणि कार्यकर्त्यांना नाही असेच दिसते. राज्यात आता भाजपची सत्ता आहे. कऱ्हाड दक्षिण मतदार संघात जो काही निधी प्राप्त होतो आहे, तो भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच. ज्यांना भाजप सरकारने राज्य मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे, असे श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिरे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या प्रयत्नामुळे व पाठपुराव्यामुळेच येत आहे, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या माध्यमातून आणि अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून आलेल्या निधीचे श्रेय लाटण्याची केविलवाणी धडपड थांबवावी."

ते पुढे म्हणाले, विरोधकांनी परवा एका पत्रकार परिषदेत टीका करताना पृथ्वीराज चव्हाण यांचे राज्यात वेगळे स्थान असून मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रीमहोदयांशी सलोख्याचे संबंध आहेत, असे विधान केले होते. उठसुठ भाजप सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांचे सर्व मंत्रीमहोदयांशी सलोख्याचे संबंध आहेत, हे मनोहर शिंदे यांचे विधान निव्वळ हास्यास्पद आहे. इतकेच नव्हे तर राज्यात त्यांचे स्थान वेगळे आहे, असाही तथाकथित दावा विरोधकांनी केला आहे. पण पृथ्वीराज चव्हाण यांचे काँग्रेस पक्षातील स्थान काय, त्यांना पक्षात काही किंमत राहिली आहे का, याबद्दल अगोदर त्यांनी खुलासा करावा आणि मग राज्यात वेगळे स्थान असल्याचा आव आणावा."

"आमचे नेते अतुल भोसले यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी कशा प्रकारचे सौदार्ह्याचे संबंध आहेत हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. इतकेच नव्हे तर पुढे जाऊन त्यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा बहाल केला. अतुलबाबांनी कऱ्हाडच्या विकासासाठी निधीचे प्रस्ताव द्यावेत. लागेल तितका निधी देण्याची जबाबदारी आमची राहील, असे जाहीर विधान दस्तुरखुद्द मुख्यमंत्री फडणवीस आणि महसुलमंत्री  पाटील यांनी वेळोवेळी कऱ्हाडमध्ये केले आहे. त्यामुळेच भोसले यांच्या प्रयत्नातून व राज्य सरकारकडे सादर केलेल्या प्रस्तावामुळेच भाजप सरकार कोट्यावधींच्या विकासनिधींची बरसात करत आहे. हे सर्व इतके स्पष्ट आहे," असेही जगताप म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com