महाजनादेश यात्रा स्वतःच्या दर्शनासाठी - अशोक चव्हाण

महाजनादेश यात्रा स्वतःच्या दर्शनासाठी - अशोक चव्हाण

नांदेड : सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा महाराष्ट्रातील लोकांचे दर्शन घेण्यासाठी काढली की स्वतःचे दर्शन देण्यासाठी काढली. यात्रेदरम्यान अनेकांना स्थानबद्ध केले आणि विरोधकांची मुस्कटदाबी केली. विरोधकांच्या खोपडीचा उल्लेख केल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या बोलण्यातून हुकुमशाही जाणवू लागली असल्याची टीकाही कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली. 

नांदेडला आयटीएम येथे श्री. चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर, भाऊराव कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, रोहिदास जाधव, प्रवक्ते संतोष पांडागळे, मुन्तजीब यांची उपस्थिती होती. शेतीचे पाणी शहराला देऊन ग्रामीण विरुद्ध शहरी असा नवा वाद निर्माण करुन त्यास खतपाणी घालण्याचे काम मुख्यमंत्री करत असल्याचा आरोप करुन श्री. चव्हाण म्हणाले की, नुसत्या घोषणा करण्याचे काम सरकार करत आहे. अजूनही महसूल आयुक्तालय झाले नाही. नांदेडला 360 कोटी तसेच 250 कोटी देणार अशा घोषणा केला पण मागील घोषणांचे काय ? कल्याण डोंबिवलीला साडेसहा हजार कोटीची आणि नाशिक येथे दत्तक घेण्याची घोषणा केली पण त्यांना काहीच मिळाले नाही. 

अशोक चव्हाण यांचे नाव घेतल्याशिवाय वजन वाढत नाही, असाच काहीसा प्रकार सत्ताधाऱ्यांमध्ये असल्याचे सांगून श्री. चव्हाण म्हणाले की, पिक विमा शेतकऱ्यांची लुबाडणुक करत असून शेतकऱ्यांनी किती पैसे भरले आणि त्यांना किती मिळाले, हे सांगायला सरकारच तयारच नाही. मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत पण शिवसेनेचे आदित्य ठाकरे बोलतात. मराठवाड्याला एक हेक्‍टरपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी अशी मागणीही त्यांनी केली. ऊसासाठी ठिबक सिंचनाचा पर्याय ठीक आहे पण मराठवाड्यात ऊसबंदी योग्य होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर 
देशभरात अर्थिक मंदी सुरु असून विकास दर घसरला आहे रोजगार निर्मिती नाही उलट आहे तेच रोजगार बंद पडत असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालल्याचे त्यांनी सांगितले. काश्‍मिरला तिरंगा फडल्याचे सांगतात पण नागपूरला आरएसएसच्या कार्यालयात कधीपासून तिरंगा फडकतो, त्यावर मुख्यमंत्री बोलत नाहीत. तसेच वंचित आघाडी विरोधी पक्ष राहील, याचे भाकित करत असतील तर इव्हीएम मशीनबाबत आम्ही घेतलेली शंका खरी आहे की काय? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

तुम्ही किती जणांना सावली दिली 
अशोकाचे झाड सावली देत नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते, त्यावर श्री. चव्हाण म्हणाले की, तुम्ही गेल्या पाच वर्षात सत्तेत आहात तर किती जणांना आणि कोणाकोणाला सावली दिली ते सांगा. गेल्या पाच वर्षातील कामगिरी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांचीच नैराश्‍येची सावली महाराष्ट्रावर पडली असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com