भाजपच्या कामांचे पेढे काँग्रेसवाले का वाटतायत? : अनिल देसाई 

पाणीपरिषदेमध्ये सभेत भाषणबाजी करताना एक महिन्याच्या आत 32 गावांच्या दोन्ही पाणी योजनेसाठी 250 कोटी महिन्याच्या आत मंजूर करणार असे आमदार गोरेंनी सांगितले होते. त्याचे पुढे काय झाले?
भाजपच्या कामांचे पेढे काँग्रेसवाले का वाटतायत? : अनिल देसाई 

सातारा  : जिहे-कटापूर योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून 350 कोटींचा निधी जाहीर झाला आहे. याचे खरे श्रेय भाजप सरकारचे आहे. मात्र, माणचे विद्यमान लोकप्रतिनिधी या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने केलेल्या कामांचे पेढे काँग्रेसवाले वाटून लोकांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.  

अनिल देसाई यांनी पत्रकात म्हटले की, मी आणि डॉ. दिलीप येळगावकर यांनी 18 सप्टेंबर 2018 रोजी जिहे-कटापूरचे पाणी आंधळी धरणातून उचलून उत्तर माणच्या 32 गावांना द्यावे, अशी मागणी म्हसवड येथील जाहीर सभेत महसूल मंत्री चंद्रकांतदादा व मंत्री महादेव जानकर यांच्या मार्फत शासनाकडे केली होती. त्यानंतर सातत्याने याचा पाठपुरावा केला आहे. मागील दीड महिन्यापूर्वी याप्रश्‍नी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत बैठक लावून राणंद व झाशी तलाव भरण्यासाठी पाणी राखीव करण्यास तत्वतः मान्यता घेतली. या बैठकीला माझ्यासह डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख, डॉ. संदीप पोळ व माण तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

काल झालेला हा ऐतिहासिक निर्णय भाजप व युती सरकारने घेतलेला असून त्याचे खरे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रासपचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे आहे. माणचे विद्यमान लोकप्रतिनिधींनी पाच वर्षांपूर्वी औंध भागातील 16 गावांतील लोकांना तत्कालिन मुख्यमंत्री चव्हाण आणि तत्कालिन राज्यपाल यांना भेटवले होते. या सोळा गावचे शिष्टमंडळ भेटवून तिथला पाणी प्रश्‍न सोडवतो, असे आश्‍वासन दिले होते. त्याचे पुढे काय झाले, अशी येथील जनता प्रश्‍न विचारत आहे. 

विखळेत आणि कुकुडवाड येथे झालेल्या टेंभू योजना पाणीपरिषदेमध्ये सभेत भाषणबाजी करताना एक महिन्याच्या आत 32 गावांच्या दोन्ही पाणी योजनेसाठी 250 कोटी महिन्याच्या आत मंजूर करणार असे आमदार गोरेंनी सांगितले होते. त्याचे पुढे काय झाले? याची उत्तरे अगोदर जनतेला द्या. भाजपच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नका. भाजपने केलेल्या कामांचे पेढे काँग्रेसवाले का वाटत आहेत, अशी चर्चा आता सुरू आहे. या कामाचे श्रेय घेण्याच प्रयत्न करू नये. कारण कुणी कामे केले हे माणच्या जनतेला माहित आहे, असा टोलाही देसाई यांनी लगावला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com