Deepak Kulkarni
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे नेहमी चर्चेत असतात.
ग्रामीण व हटके भाषाशैली, साधं राहणीमान यामुळे ते राज्यातच नाहीतर दिल्लीदरबारीही ओळखले जातात.
दानवेंचा राजकीय जीवनातला प्रवेश त्यांच्या ग्रामपंचायतीपासून झाला.
त्यांनी १९९० व १९९५ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून आले. नंतर १९९९, २००४ व २००९, २०१४ आमि २०१९ अशा पाचवेळा भाजपच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले.
रोज हिरवा झेंडा दाखवून आणि फीत कापून विविध विकासकामांचे उद्घाटन करणाऱ्या दानवेंचा आजमात्र वेगळाच लूक पाहायला मिळाला.
त्यांनी हातात चक्क कुऱ्हाड घेतलेली पाहायला मिळाली.
दानवे यांनी हातात कुऱ्हाड घेवून थेट जालन्यातील घाणेवाडी (ता.जालना) येथील संत गाडगेबाबा जलाशय गाठले.
यावेळी जलाशयाच्या भिंतीवरील वाढलेली गवत, काटेरी झुडपे कुऱ्हाडीने तोडली.
या प्रकल्पाची भिंत स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून काम सुरू असून, त्यानिमित्ताने श्रमदान मोहिमेत रविवारी दानवेंनी सहभाग नोंदवला.
जलाशयाच्या परिसरात प्लास्टिक कचरा देखील मोठ्याप्रमाणावर जमा झाला. त्यामुळे या प्रकल्पाची भिंत स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करण्यात आला.
प्रत्येक रविवारी लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवली जाते.
केंद्रीय मंत्री असताना देखील दानवे श्रमदान मोहिमेत दाखल झाल्याने पुन्हा एकदा त्यांचा साधेपणा पाहायला मिळाला असून त्याची जोरदार चर्चा देखील पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागातील राजकारणाची उत्तम जाण आणि त्यावर पकड असणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये रावसाहेब दानवे यांचे नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल.