सरकारनामा ब्युरो
खासदार संजय राऊत यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर भीमा पाटस साखर कारखान्याच्या माध्यमातून ५०० कोटींच्या गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.
राहुल कुल हे दौंड विधानसभा मतदार संघातून 2014 आणि 2019 असे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात यांचा थोड्या मतांनी पराभव केला.
आमदार राहुल कुल यांचे वडील सुभाष कुल हे 1990 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. 1999 मध्ये सुभाष कुल हे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार झाले.
सुभाष कुल यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या पत्नी रंजना कुल आमदार झाल्या. वारसा म्हणून राष्ट्रवादीने 2009 मध्ये राहुल कुल यांनाच संधी दिली, मात्र त्यांचा पराभव झाला. पक्षाने बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप कुल यांनी केला.
2014 मध्ये राहुल कुल राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) तिकिटावर निवडणूक लढले अन् आमदार झाले. त्यावेळेपासून ते शरद पवार यांचे कट्टर विरोधक मानले जातात.
2019 मध्ये कुल यांनी रासप सोडून भाजपात प्रवेश केला आणि आमदार झाले. आता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.
2019 मध्ये बारामती लोकसभा निवडणुकीसाठी राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढल्या आहेत.
संजय राऊत यांच्या अक्षेपार्ह वक्त्यव्यावर काय शिक्षा द्यायची, यासाठी नेमलेल्या हक्कभंग समितीचे अध्यक्ष आमदार राहुल कुल आहेत. त्यानंतर राऊतांनी कुल यांच्यावर पाचशे कोटींचा आरोप केला आहे.