तेलंगणातील नागरीक आल्याप्रकरणी अमित देशमुखांनीच केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी

देशात लॉकडाऊऩ असताना हरियानात धार्मिक कार्यक्रम करून काही राज्य तसेच महाराष्ट्रातील चार जिल्हे ओलांडून तेलंगाणातील बारा नागरीक निलंग्यात आलेच कसे? असा प्रश्न उपस्थितीत करून याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे
Amit Deshmukh Demands Inquiry into Telangana Citizens Migration
Amit Deshmukh Demands Inquiry into Telangana Citizens Migration

लातूर : देशात लॉकडाऊऩ असताना हरियानात धार्मिक कार्यक्रम करून काही राज्य तसेच महाराष्ट्रातील चार जिल्हे ओलांडून तेलंगाणातील बारा नागरीक निलंग्यात आलेच कसे? असा प्रश्न उपस्थितीत करून याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नव्हता. पण या बारा व्यक्ती पैकी आठ व्यक्ती पॉझिटीव्ह आल्याने लातूर जिल्हा हादरून गेला आहे. सर्वांचीच झोप उडवली आहे. या व्यक्ती महाराष्ट्रातील धुळे, औरंगाबाद, बीड तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रवास करीत निलंग्यात आले होते.  लॉकडाऊऩच्या काळात या व्यक्तींनी प्रवास केलाच कसा? त्यांना वाटेतच का आडवले नाही? परराज्यातून येवूनही त्यांची वाटेतच तपासणी करून क्वारन्टाईन का करण्यात आले नाही? उस्मानाबादच्या पोलिसांनी लातूर जिल्ह्यातपर्यंत त्याना का आणून सोडले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. 

गृहमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी

आता यात पालकमंत्री देशमुख यांनीच लक्ष घालून देशात  सर्वत्र लॉकडाऊन असताना आणि जमावबंदीचा आदेश लागू असताना ता. 2 एप्रिल रोजी मध्यरात्री लातूर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून बारा व्यक्ती लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे कशा पोहोचल्या याची चौकशी करण्याची मागणी केली आहे .बारा पैकी आठ जण करोनाग्रस्त असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या घटनेची देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. लॉकडाऊनच्या काळात या व्यक्तींना निलंगा येथील धार्मिक स्थळात आश्रय देण्यात आला होता. 

खरेतर असे अनोळखी व्यक्ती आढळून येताच याची माहिती संबंधितांनी पोलीस, जिल्हा प्रशासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने द्यावयास हवी होती. या प्रकरणी या धार्मिक स्थळाचे कार्यवाह यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

या प्रकारामुळे जिल्ह्यातील सर्वच निष्पाप नागरिकांना धोका निर्माण करण्याचा प्रकार पुढे आला आहे. या घटनेची  कठोर शब्दात निंदा करीत असल्याचे सांगून यापुढे जिल्ह्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रत्येकाने कायद्याचे कठोर पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com