उस्मानाबाद : राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राजकीय समीकरणे बदलणार असे संकेत बुधवारी (ता. चार) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मिळाल्याचे दिसुन येत आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत भाजपवासी झालेले सदस्य, भाजपचे सदस्य याच्याविरोधात शिवसेना, काँग्रेस व राहिलेले राष्ट्रवादी सदस्य एकत्र आल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यामुळे यापुढील काळात भाजप विरुध्द सर्व पक्ष असे समीकरण जुळुन आल्यास आश्चर्य वाटायला नको.
उस्मानाबादच्या राजकारणात या अगोदर राणाजगजितसिंह पाटील यांच्या घराण्याविरोधात इतर सर्व पक्ष असे समीकरण जुळुन येत होते. मधल्या काळात भाजपने राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेमध्ये व जिल्हा बँकेमध्ये साथ दिली होती. पण आता राणाजगजितसिंह पाटील हे स्वतःच भाजपवासी झाल्याने त्यांना मानणारा गट त्यांच्याबरोबर गेला आहे, त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील व उपाध्यक्ष अर्चना पाटील यांच्यासह सदस्य देखील आहेत. यांनी प्रत्यक्ष भाजपामध्ये प्रवेश केला नसला तरी नेत्यांचा प्रवेश त्यांचा प्रवेश मानला जात आहे. त्यामुळे बुधवारी झालेली सर्वसाधारण सभा अडीच वर्षातील सर्वात वादळी झाल्याचे दिसुन आले.
यावेळी शिवसेना. राष्ट्रवादी व काँग्रेस यानी एकत्र येत राणा जगजितसिंह पाटील यांच्या गटाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. शिवाय सर्वानी एकत्र येत सभात्याग करुन पुढील राजकीय समीकरणाचे संकेत दिले. भविष्यात चार महिन्यानी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवड होणार आहे, तेव्हा ही राजकीय समीकरण जुळुन येणार का, याविषयी आतापासुन चर्चा करण्यात येऊ लागली आहे. राष्ट्रवादीचे 26 सदस्य होते, त्यातील नऊ सदस्यच आता राष्ट्रवादीकडे शिल्लक राहिले आहेत. भाजपकडे चार,काँग्रेस 13, शिवसेना 11 व अपक्ष (भापसे) एक असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेवर सत्तेची गणित कशी असणार याची चर्चा राजकीय क्षेत्रात होऊ लागली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.