एक-एक आमदार निवडून दिल्यावर आपला मुख्यमंत्री कसा होणार? अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावले 

अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत आज (ता. 26) मराठवाडा विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेस बुथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना अजित पवार यांनी दीड तासांच्या भाषणात राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून हल्ला चढवला. गल्ली ते दिल्लीपर्यंतचे विषय हाताळत अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत चौफेर टोलेबाजी केली.
एक-एक आमदार निवडून दिल्यावर आपला मुख्यमंत्री कसा होणार? अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावले 

औरंगाबादः ''गावचा सरपंच तुमचा नाही, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार दुसऱ्या पक्षाचा आणि जिल्ह्यातून तुम्ही एक-एक आमदार निवडून देणार. मग राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कसा होणार? मुख्यमंत्री व्हायला 145 ची मॅजिग फिगर गाठावी लागते. तेव्हा नुसत्या घोषणा देऊन जमणार नाही तर या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून काम करावे लागेल," अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुनावले. 

अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत आज (ता. 26) मराठवाडा विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेस बुथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना अजित पवार यांनी दीड तासांच्या भाषणात राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून हल्ला चढवला. गल्ली ते दिल्लीपर्यंतचे विषय हाताळत अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत चौफेर टोलेबाजी केली. 

अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा आधीच्या वक्‍त्यांनी केलेला उल्लेख आणि कार्यकर्त्यांची घोषणाबाजी याचा संदर्भ देत पवारांनी चांगल्याच कानपिचक्‍या दिल्या. अजित पवार म्हणाले, "आधी आपले घर सांभाळा मग दुसऱ्याला शिकवण्याचा भानगडीत पडा. माझ्या तालुक्‍यात आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच माझ्या पक्षाचा आहे, म्हणून माझ्याकडे कुणी बोट दाखवू शकत नाही. पण इतरांचे काय?" 

"मुख्यमंत्री काय फक्त घोषणा देऊन होता येत का? त्यासाठी मॅजिक फिगर पाहिजे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून फक्त एक-एक आमदार निवडूण दिला तर कस होणार? 1967 पासून म्हणजेच पन्नास वर्षापासून बारामतीमधून आपले नेते शरद पवार आणि मी निवडून येतो. का लोक एवढ आमच्यावर प्रेम करतात? बारामतीत जसे काम आम्ही केले तसे काम युवकांच्या माध्यमातून संपुर्ण राज्यात झाले पाहिजे." असे सांगत युवा कार्यकर्ता हा पक्षाचा पाया असतो, तो मजबूत असेल तर तुमची सत्ता येण्यापासून कुणी रोखू शकत नाही, असा आत्मविश्‍वास देखील अजित पवार यांनी व्यक्त केला. 

तुमची साथ मनापासून पाहिजे
ते पुढे म्हणाले, "लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होतील, विधानसभा आणि लोकसभा एकत्रित घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसा लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे, त्यामुळे गाफील न राहता तयारीला लागा असे आवाहन अजित पवार यांनी केले. काँग्रेस सोबत आघाडीची चर्चा सुरू आहे, त्याचा निर्णय आपले नेते शरद पवार आणि काँग्रेसचे राहूल गांधी घेतील. जिथे ज्याची ताकद तिथे त्याचा उमेदवार हे धोरण ठेवले तरच सरकार येऊ शकेल. ज्यांच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे त्यांच्याकडे सत्ता आहे. तेव्हा खूप मेहनत घ्यावी लागेल. गेल्या चार वर्षात मोदींनी सांगितलेली एक तरी गोष्ट करून दाखवली का? हे लोकांमध्ये जाऊन सांगा" तरुणांना दोन कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती, नव्या नोकऱ्या तर मिळाल्या नाही पण आहे त्या देखील गेल्या ही वस्तुस्थिती जनतेसमोर आणा असे आवाहन देखील अजित पवार यांनी युवकांना केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com