माळेगाव : ``माळेगाव हा पवारसाहेबांचा साखर कारखाना म्हणून ओळखला जातो. मागल्यावेळी राष्ट्रवादीच्याच नाराज मंडळींनी विरोधकांना साथ दिली आणि येथे सत्तांतर झाले. अर्थात त्याचा खासदार, आमदार, अथवा जिल्हा व तालुका पंचायतीच्या निवडणूकीत एक टक्कासुद्धा फरक पडला नाही. मात्र साहेबांची व माझी सर्वत्र बदनामी झाली. या निवडणूकीत ती चूक आपण सर्वांनी सुधारायची असून कोणत्याही परिस्थितीत सभासदांच्या हितासाठी आणि पवारसाहेंबाना अभिमान वाटावा असा माळेगाव जिंकायचा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांच्या वतीने निर्धार व्यक्त केला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचावर्षिक निवडणूक लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांनी सभासद शेतकरी मेळावा घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, मदनराव देवकाते, केशवराव जगताप, योगेश जगताप, संभाजी होळकर आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ``माळेगावची सत्ता स्वतःच्या हिंमतीवर घेण्याची ताकद ही राष्ट्रवादीमध्ये आहे. विरोधक रंजन तावरे, चंद्रराव तावरे हे राष्ट्रवादीमधील नाराज मंडळींचा खुबीने आधार घेतात आणि जिंकतात. हे १९९७ व २०१४ साली घडले आहे. अर्थात ज्याज्यावेळी राज्यात सत्तांतर झाले, त्यावेळी मात्र माळेगावात सत्तांतर झाले आहे. आता मात्र सरकारामध्ये राष्ट्रवादी पक्षातील नेतेमंडळी सक्षम राज्यकर्ता म्हणून पुढे आली आहेत. या सत्तेचा फायदा शेतकऱ्यांच्या हितासाठी केला जाईल.``
माळेगावने ३४०० रुपये भाव जरी जाहिर केला असला तरी मागिल ठेवींसह अद्याप २८५ रुपये सभासदांना देणे बाकी आहे. ऊसाचे क्षेत्र नसताना विस्तारिकण करून कारखान्याचा घास वाढविला आणि दोनशेपेक्षा अधिक कोटींचे विविध प्रकारचे कर्ज शेतकऱ्यांच्या डोक्यावर करून ठेवले. नविन यंत्रसमामुग्रीत सातत्याने बिघाड होत असून ऊसाचा रस वाया जात आहे. खरेदीत भ्रष्टाचार, रिकव्हीरीत लाॅस, वीजेची विक्री कमी, गेटकेनधार्जीने धोरण, भरमसाठ कामगार भरती आदींमुळे सभासदांचे मोठे नुकसान होताना पाहवत नाही,`` अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. यावेळी मदनराव देवकाते, योगेश जगताप यांनी विरोधक सत्तेत आल्यानंतर १० लाख साखर पोत्यांची निच्चांकी दराने साखर विक्री केली व सभासदांचा सुमारे २० कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप अजितददांनी केला.
माळेगावच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेली तिसरी आघाडीलाही विश्वासात घेवून राष्ट्रवादीचे निलकंठेश्वर पॅनेल तयार केले जाईल. त्यापद्धतीने सुरेश खलाटे, रामदास आटोळे, राजेंद्र बुरुंगले, अविनाश देवकाते, राजेंद्र ढावण यांचीशी चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.
अजितदादांच्या कार्यकर्त्यांना सूचना
इच्छुकांनी उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी भवनमध्ये देणे, माळेगावच्या सभासदांना विक्रमी ऊस दर देण्यास कटिबद्ध, महाआघाडीतील काॅग्रेस, शिवसेना व स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे, राष्ट्रवादी पार्टीतील एकमेकांची मने दुखवतील असे न बोलणे, उमेदवारी न मिळणाऱ्या इच्चुकांना इतर ठिकाणी संधी देणे, सरकारच्यावतीने माळेगावला आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन पवार यांनी उपस्थितांना केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.