अजित पवार नेहमीप्रमाणे स्पष्ट बोलले : नेत्यांना दिल्या कानपिचक्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जनतेने उत्स्फूर्तपणे देशात बंद पाळला. मात्र त्यानंतर घंटानादासाठी पुन्हा रस्त्यावर गर्दी केली. त्यावर अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
ajit pawar about curfew
ajit pawar about curfew

मुंबई : कोरोनाविरोधात लढणाऱ्या राज्यातील आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासन आणि सर्वांचेच मनापासून आभार. नागरिकांनी आपल्या घरातून घंटानाद, थाळीनाद केले त्याबद्दल त्यांचेही आभार; परंतु लोकप्रतिनिधी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून एकत्र येऊन हा घंटानाद करणे अपेक्षित नव्हते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांनी गर्दीला प्रोत्साहन, प्रसिद्धी देणे टाळण्याची गरज आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्व जण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत; मात्र ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोहचवत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे रस्त्यावर उतरून गर्दी करणे टाळावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला दैनंदिन व्यवहार थांबविण्याचे आवाहन केले होते. त्याला जनतेने चांगला प्रतिसाद दिला. तो पाहिल्यानंतर जनता धन्यवादाला पात्र आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज कौतुक केले.

"जनतेच्या कर्फ्यू'पर्यंत समाधान मानून चालणार नाही. जगावर कोरोनाचे महाभयंकर संकट आहे. त्यामधून बाहेर पडण्यासाठी सामूहिक आणि व्यक्तिगत पातळीवर एकजुटीने लढा देण्याची आवश्‍यकता आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 31 मार्चपर्यंत पूर्णपणाने अशाच प्रकारची भूमिका घेण्याचे सुचविले आहे. त्याला आपण सगळे जण साथ देऊया. सर्वसामान्य माणसाला यातून वाचविण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहनही पवार यांनी जनतेला केले आहे.

आठ हजार हाॅटेल बंद

"जनता कर्फ्यू'मुळे मुंबईतील सुमारे दोन लाख रिक्षाचालकांचे 15 कोटी रुपयांचे; तर तेवढ्याच फेरीवाल्यांचे सुमारे 60 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शहरातील आठ हजार हॉटेलचालकांनाही आज सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. अर्थात या सर्वांना गेले काही दिवस मंदीमुळे उत्पन्न घटल्याचा अनुभव येतच होता; मात्र आज सर्वत्र संचारबंदी असल्याने रिक्षा रस्त्यावर आल्याच नाहीत, तर हॉटेलही उघडली नाहीत.

मुंबईतील रिक्षाचालकांचा रोज सुमारे हजार-बाराशे रुपयांचा धंदा होतो असे गृहित धरले तरी त्यातून इंधन, देखभाल, कर्जाचा हप्ता, मालकाला द्यायचे भाडे आदी खर्च वगळून त्यांना रोज सरासरी 500 ते 700 रुपये उत्पन्न मिळते. मुंबईत सुमारे दोन लाख रिक्षाचालक असून, कर्जाने रिक्षा घेतलेल्यांना दरमहा किमान पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागतो. मालकाला रोज किमान अडीचशे रुपये भाडे द्यावे लागते. उद्यापासून रेल्वे बंद असल्याने व बेस्ट बसचा वापर केवळ अत्यावश्‍यक सेवांसाठीच होणार असल्याने लोकांना खऱ्या अर्थाने सार्वजनिक वाहतुकीसाठी केवळ रिक्षाच उपलब्ध राहणार आहेत; पण प्रवासीच कमी झाले आहेत. त्यामुळे उद्यापासून काय परिस्थिती राहील तेही पाहावे लागेल. सुमारे दोन ते अडीच लाख फेरीवाले आहेत. यांची रोजची उलाढाल शंभर ते सव्वाशे कोटी रुपये असून, त्यांचे रोजचे उत्पन्न प्रत्येकी अंदाजे तीन ते चार हजार रुपये आहे, असे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com