अजित पवार, जयंत पाटील यांनी फिरले पाहिजे : विनोद तावडेंची अपेक्षा

भाजपने आता सरकारला धारेवर धरण्यास सुरवात केली आहे....
अजित पवार, जयंत पाटील यांनी फिरले पाहिजे : विनोद तावडेंची अपेक्षा

पुणे :"कोरोनाच्या काळात सरकारकडून होत असलेल्या घोषणांची अंमलबजावणी  होते का? हे पाहण्यासाठी नेत्यांनी फिल्डवर आले पाहिजे. आता फक्त घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात काहीही होत नाही," अशी टिका माजी मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.

"आम्ही सरकारसोबत आहोत. आम्हाला या काळात राजकारण करायचे नाही. मात्र सरकार जिथं कमी पडत आहे तिथं आम्हाला बोललं पाहिजे," असे तावडे यांनी सांगितले. सरकार काम करत नाही असं मला म्हणायचं नाही. सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ते तोकडे पडत आहेत. सरकार अनेक घोषणा करत आहे. त्यातील किती घोषणांची अंमलबजावणी होते?' असा सवाल तावडे यांनी विचारला. "आरोग्यमंत्री राजेश टोपे लोकांच्यात फिरत आहेत. दवाखान्याना भेटी देत आहेत. तसे इतर मंत्र्यांनी स्वतःची काळजी घेऊन फिरले पाहिजे. परिस्थिती समजून घेतली पाहिजे,'असे त्यांनी सांगितले.

"उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे लोकांच्यातील नेते आहेत. त्यांनी फिरले पाहिजे. ते फिरले तर त्यांनाही नेमकी काय परिस्थिती आहे हे समजेल. सध्या नोकरशाहीच्या ताब्यात सगळी यंत्रणा आहे. आणि नोकरशाहीला तसा जनतेचा रोजचा अनुभव नसतो. त्यामुळे नेत्यांनी फिरले पाहिजे. डॉक्टर आणि पोलीस जसे फिल्डवर आहेत. तसे नेत्यांनी कार्यालयात किंवा घरात न बसता फिल्डवर जाण्याची गरज आहे. मात्र जाताना काळजी घेतली पाहिजे." असे तावडे म्हणाले.

"ज्या लोकांना शाळेमध्ये क्वारंटाईन केले आहे. त्या लोकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. तिकडे कोणाचे लक्ष नाही. सुविधा नसलेल्या ठिकाणी या लोकांना का ठेवले," असाही प्रश्न त्यांनी विचारला.

वांद्रे येथे नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे राज्य सरकार अभिव्यक्तीची कशी मुस्कटदाबी करत आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात एका पत्रकाराला झालेली अटक म्हणजे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर घातलेला घाला आहे, असा आरोप त्यांनी केला.

सोशल मीडियावर सरकारविरोधात सध्या जो आवाज उठतोय, त्यातून या महाविकास आघाडीची सर्वांवर अंकुश ठेवणारी वृत्तीच दिसून येत आहे. या जागतिक आपत्तीच्या काळात केंद्र सरकार देशभरातील वंचितांच्या पाठिशी उभे आहे आणि त्यांना विविध योजनांतून सर्वतोपरि साह्य केले जात आहे. पण हे चित्र महाराष्ट्रात दिसून येत नाही. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या वंचित गटांच्या समस्यांकडे महाराष्ट्र सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे का? का त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही, असा सवाल तावडे यांनी फेसबुक लाइव्हवर राज्य सरकारला विचारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com