अजितदादांनी केले नागपूर कनेक्शन कट: महापालिकेत पुण्यातील अधिकारी

....
अजितदादांनी केले नागपूर कनेक्शन कट: महापालिकेत पुण्यातील अधिकारी

पुणे : पुणे महापालिकेची आयुक्त सौरभ राव यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्याजागी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. तर गायकवाड यांच्याजागी राव हे नवे साखर आयुक्तपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

नवे आयुक्त शेखर गायकवाड हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटचे मानले जातात. पालकमंत्री होताच पवार यांनी पुणे-पिंपरी-चिंचवड महापालिकांत अधिक लक्ष्य घातले असून, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बैठका, निर्णयांचा धडाका लावला आहे. तेव्हाच, राव यांच्या बदलीनंतर आयुक्तपदाची जबाबदारी गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत गायकवाड यांना आणून सत्ताधारी भाजपला रोखण्याची नीती पवार यांनी अवलंबल्याची चर्चा आहे.

सौरभ राव यांची नियुक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाली होती. ते नागपूरहून पुण्यात जिल्हाधिकारी म्हणून आले होते. पुण्यातील जिल्हाधिकारी पदाचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांना महापालिकेत नेमण्यात आले. फडणवीस यांच्या काळात नागपूरमधील अनेक अधिकारी पुण्यात आले होते. आता अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रिपदाची सूत्रे आल्यानंतर त्यांनी पुण्यातील अधिकाऱ्यांकडे महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. गायकवाड हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आहेत. त्यांनी पुण्यातच हवेली उपविभागीय अधिकारी, भूजल संचालनालय आणि साखर आयुक्तालयाची जबाबदारी सांभाळली होती. सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. पुण्यातील यशदा या संस्थेत काही काळ ते होते. 

आयुक्त पदावरून राव यांची पावणेदोन वर्षांत बदली झाली आहे. राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश राज्य सरकारने मंगळवारी काढला. त्यात राव यांच्यासह पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा होती. त्यात राव आणि गायकवाड यांचा समावेश आहे.

तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या बदलीनंतर राव यांची एप्रिल 2018 मध्ये महापालिका आयुक्तपदावर नेमणूक झाली. या काळात नियोजित मेट्रो, समान पाणीपुरवठा, भामा आसखेड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती दिली. तसेच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे, "पीएमपी'च्या ताफ्यात नव्या बसगाड्या आणून ही व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी भूमिका घेतली. चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचा प्रश्‍नही त्यांनी बहुतांशी प्रमाणात सोडविला. मात्र, वर्षानुवर्ष रेंगाळेले "एचसीएमटीआर' नदीसुधार (जायका), नदीकाठ संर्वधन योजनां पुढे सरकाविल्या; परंतु,निविदांमधील वादाने त्या अंमलबजावणीपर्यंत पोचू शकल्या नाहीत. त्याशिवाय, हापालिकेत समावेश झालेल्या गावांत पायाभूत सुविधा विस्तारण्यावर राव यांचा भर रहिला. 

महापालिकेतील बहुतांशी आयुक्तांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर तीन महिन्यांनी बदली झाली. त्यामुळे कुणाल कुमार यांनी सलग चारवेळा महापालिकेचा अर्थसंकल्प मांडला. मात्र, राव यांना एकच अर्थसंकल्प मांडण्याची संधी गेल्या वर्षी मिळाली. ते दुसऱ्यांदा पुढच्या चार-पाच दिवसांत अर्थसंकल्प सादर करणार होते. त्याआधीच त्यांची बदली झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com