फडणविसांचा बारामतीच्या विरोधातील निर्णय अजितदादांनी फिरवला

...
फडणविसांचा बारामतीच्या विरोधातील निर्णय अजितदादांनी फिरवला

मुंबई : नीरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगीकरण, कृषीपूरक उद्योग, साखर कारखाने, फळबागांना होईल, असा दावा करण्यात आला आहे.

नीरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे शिल्लक राहणारे पाणी नीरा उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राला समान पद्धतीने देण्याचा कॅबिनेट निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रातील सगळ्यांना होईल. डाव्या कालव्यात 55 % आणि उजव्या कालव्यात 45% पाणी सोडणार. नीरा डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यातील काही गावे येतात. तर उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात पंढरपूर, सांगोला,खंडाळा,फलटण,माळशिरस तालुक्यांचा समावेश आहे. पाणी पिण्यासाठी, औद्योगिक आणि शेतीसाठी उपलब्ध होणार आहे. भाजप सरकार असताना बारामतीला जाणाऱ्या  डाव्या कालव्याचे पाणी थांबवले होते. आता महाविकास आघाडी सरकरने निर्णय बदलला आहे.

माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या आग्रहामुळे उजव्या कालव्याला जास्त पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पाठराखण केली होती. बारामतीला जादा मिळणारे पाणी थांबवून इतर जिल्ह्यांतील तालुक्यांसाठी देण्यात येत असल्याचा युक्तिवाद तेव्हा करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच मतदारसंघात याबाबत प्रश्न विचारला जात होता. तो निर्णय अजितदादांनी फिरवून अतिरिक्त पाण्याचे दोन्ही कालव्यांत समसमान वाटप केले आहे. 

नीरा देवघर धरणाचे काम सन -2007 मध्ये पुर्ण असुन 11.73 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झालेला आहे व गुंजवणी धरणात सन 2018 पासून  3.69 टीएमसी पाणीसाठा निर्मीत झालेला होता. या दोन्ही प्रकल्पांच्या कालव्याची कामे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियोजीत लाभक्षेत्रात पाणी वापर होऊ शकत नाही,ही बाब विचारात घेऊन या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने या दोन्ही धरणात उपलब्ध होणारे मूळ प्रकल्पाची गरज भागल्यावर शिल्लक राहणारे पाणी निरा डावा कालवा व निरा उजवा कालवा यात समन्यायी तत्वावर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे वाटप निरा डावा कालवा 55 % व निरा उजवा कालवा 45 % असे राहील. या निर्णयामुळे दोन्ही कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये समन्यायी तत्वावर 2427 हेक्टर/टीएमसी या प्रमाणात पाणी सिंचनासाठी उपलब्ध होईल.  डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील पुरंदर व बारामती, इंदापूर तालुक्यातील 37070 हे. लाभक्षेत्राला व नीरा उजव्या कालव्याच्या खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर सांगोला तालुक्यांच्या 65506 हे. लाभक्षेत्राला फायदा होईल. आठ तालुक्यांतील ग्रामीण / शहरी भागाच्या पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.  उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील बिगर बारमाही पंढरपुर व सांगोला तालुक्यातील ब्रँच 2 च्या खालील वितरीकांना उन्हाळी हंगामामध्ये सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच या दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगिकरण व परिसरातील कृषीपुरक उद्योग जसे साखर कारखाने, दुग्धव्यवसाय, पोल्ट्री फॉर्म व फळबागांवर अवलंबुन असणारे उद्योग सुरळीतपणे चालु राहतील.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com