मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे आणि प्रवीण परदेशी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यात कुंटे यांचे नाव आघाडीवर होते. अखेर राज्य सरकारने कुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. याबाबतचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी काढला.
कुंटे हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून गृह विभागात कार्यरत आहेत. 1985 च्या बॅचचे आयएएस असलेले कुंटे हे येत्या नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. त्यांनाही नऊ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. त्यांनी पुण्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी, धुळ्याचे जिल्हाधिकारी, मुंबई महापालिकेत उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त या तीनही पदांवर काम केले. तसेच गृहनिर्माण विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. संजयकुमार यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्तीच्या वेळीच कुंटे यांचेही नाव चर्चेत होते. संजयकुमार हे त्यांना वरिष्ठ असल्याने कुंटे यांचे नाव मागे पडले होते.
कुंटे यांच्या नावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा पाठिंबा होता मात्र, राष्ट्रवादीचा त्यांना विरोध होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मर्जीतील कुंटेंची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल माध्यमांशी बोलताना कुंटे म्हणाले की, कोरोनाचे संकट हाताळणे, राज्याची आर्थिक घडी सुधारणे आणि मोठ्या विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याला माझे प्राधान्य असेल.
विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार हे रविवारी (ता.28) निवृत्त होत आहेत. त्यामुळे आज नव्या मुख्य सचिवांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता होती. संजयकुमार यांनी आठ महिने या पदावर काम केले. निवृत्तीनंतर ते राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष या पदावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांना `महारेरा`वर जायचे होते. मात्र तेथे अजोय मेहता यांची नियुक्ती झाल्याने संजय कुमारांसाठी वीज नियामक आयोगाचा पर्याय उरला आहे. आनंद कुलकर्णी यांच्या निवृत्तीनंतर नियामक आयोगाचे अध्यक्षपद हे चार जानेवारीपासून रिक्त आहे.
या पदासाठी इच्छुक असलेले परदेशी हे देखील नोव्हेंबर 2021 मध्येच निवृत्त होणार असल्याने त्यांनीही या पदासाठी प्रयत्न सुरू केले होते. मुंबई पालिका आयुक्त म्हणून परदेशी यांची महाविकास आघाडी सरकारने कोरोनाकाळात तडकाफडकी बदली केल्याने ते नाराज होते. त्यांची नगरविकास विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती सरकारने त्यानंतर केली. मात्र त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील जबाबादारी स्वीकारून त्यांनी मुंबई सोडली. ते पुन्हा राज्याच्या प्रशासनात परतण्यास इच्छुक आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयाची जबाबदारी परदेशी यांनी सांभाळली होती. परदेशी यांनी या पदासाठी प्रयत्न सुरू केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोणाची निवड करणार, याकडे लक्ष लागले होते.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.