देशपातळीवरील आघाडीत शिवसेना नाही, संघवींनी शक्‍यता फेटाळली 

देशपातळीवरील आघाडीत शिवसेना नाही, संघवींनी शक्‍यता फेटाळली 

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना केवळ आश्‍वासनांची खैरात करत "मेरा भाषण ही मेरा शासन' असा थेट संदेश मोदी यांनी दिला आहे. या चार वर्षांत केवळ जुमलेबाजी करतच सरकारचे कौतुक करण्यावर भर असल्याची टीका कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी केली. मुंबई कॉंग्रेस कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर भाजपविरोधी आघाडी तयार होत असली तरी, त्यात शिवसेनेच्या सहभागाची शक्‍यता अखिल भारतीय कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु संघवी यांनी फेटाळून लावली.

या वेळी कॉंग्रेसने मोदी सरकारच्या चार वर्षांतील घोषणा व त्यांच्या अंमलबजावणीबाबत "जुमला किंग' या सोशल मीडियातल्या सिरीजची सुरुवात सिंघवी यांच्या हस्ते केली. या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रात शिवसेनाही भाजपच्या विरोधात बोलत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भाजपविरोधात उभ्या राहणाऱ्या आघाडीत शिवसेनेचा सहभाग असेल का, असे विचारले असता, वैचारिक मतभेदाचा मुद्दा उपस्थित करून सिंघवी यांनी त्यावर नकारात्मक उत्तर दिले. 

मागील चार वर्षांत देशातील निर्यात घटली, बेरोजगारीत प्रचंड वाढ झाली. सत्तेवर येण्यापूर्वी ज्या घोषणा दिल्या त्या सर्वच हवेत विरल्याची टीकाही सिंघवी यांनी केली. देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कृषी क्षेत्राचा विकास दर मोठ्या प्रमाणात घटला आहे. कॉंग्रेस आघाडीच्या काळात महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा विकास दर हा 4.2 टक्के इतका होता; मात्र या सरकारच्या काळात हा दर 1.9 टक्केवर आला आहे. तसेच कृषी मालाला 50 टक्के वाढीव दर देण्याची घोषणा करून अंमलबजावणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

नोकऱ्यांची घोषणा हवेत विरली
निवडणुकीआधी भाजप सरकारने दोन कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती; मात्र प्रत्यक्षात आता रोजगार तर सोडा; उलट सुशिक्षित तरुणांना पकोडे तळण्याचे काम करा म्हणून सल्ले मोदी आणि शाह देत आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पनामासारख्या ब्लॅक मनीच्या घटना उघडकीस आल्या. या प्रकरणात एकालाही अटक केली नाही. विजय मल्ल्या, नीरव मोदी, चोक्‍सीसारख्या नऊ लोकांनी 61 हजार कोटींचा घोटाळा केला आहे. त्यावरही काही कारवाई केली नसल्याचा आरोप करत कुठेत अच्छे दिन असा सवाल करत हे दिवस तर दुखवटा वर्षे असल्याची टीकाही त्यांनी केली.  

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com