मंत्रिपदासाठी अब्दुल सत्तार मुंबईत ठाण मांडून ?

मंत्रिपदासाठी अब्दुल सत्तार मुंबईत ठाण मांडून ?

औरंगाबाद : राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन होऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षाला यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. सत्ता स्थापनेनंतर मुंबईत असलेले सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात परतले असले तरी शिवसेनेचे अब्दुल सत्तार मात्र अजूनही मुंबईतच ठाण मांडून आहेत. मंत्रिमंडळात आपला समावेश व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत, त्यामुळेच सत्तारांनी मुंबईतच थांबणे पसंत केल्याची चर्चा आहे. 

कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झालेले आणि भाजपचा मतदारसंघ स्वतःसाठी सोडवून घेत विजयी झालेले अब्दुल सत्तार सध्या चांगलेच चर्चेत आहेत. राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडीत सत्तार प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया देण्यात आघाडीवर होते. अगदी पक्षप्रमुखांनी आम्हाला पाच दिवसांचे कपडे, आधार आणि पॅन कार्ड घेऊन बोलावले आहे, या व आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांची डोकी फोडू अशा विधानांमुळे सत्तारांनी मिडियाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. त्यानंतर मात्र मिडियाशी बोलू नका अशा सूचना वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे ते काहीकाळ शांत असल्याचे देखील बोलले जाते. 

सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून अब्दुल सत्तार सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. दोनदा कॉंग्रेसच्या तर यावेळी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी हॅटट्रीक साधली. भाजप प्रवेशाला विरोध झाल्यानंतर सत्तारांनी शिवसेनेत प्रवेश मिळवत मतदारसंघ देखील सोडवून घेतला. सिल्लोडमध्ये उध्दव ठाकरे यांना प्रचारसभा घ्यायला लावून संपूर्ण मतदासंघात शक्तीप्रदर्शन केले. उध्दव ठाकरे यांनी देखील सत्तार आमच्याकडे आल्यामुळे आता सत्ता देखील येणार असे विधान जाहीर सभेत केले होते. योगायोगाने उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि राज्यात सत्ता देखील आली. 

मंत्रिपदाच्या शर्यतीत सत्तार ? 
औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदा शिवसेनेचे सर्वच्या सर्व सहा उमेदवार विजयी झाले आहेत. यात संदीपान भुमरे पाचव्यांदा, तर संजय शिरसाट आणि नव्यानेच पक्षात दाखल झालेले सत्तार सलग तिसऱ्यांदा निवडूण आले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये जिल्ह्यातील कोणत्या आमदाराला मंत्रिपदाची लॉटरी लागणार या यादीत सत्तार यांचे नाव आघाडीवर असल्याचे बालेले जाते. त्यानंतर संजय शिरसाट व भुमरे यांची नावे येतात. 

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या विरोधात बंड पुकारत सत्तारांनी पक्ष सोडला होता. त्यानंतर झालेल्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले होते. दानवे यांच्या विजयात सत्तार यांची भूमिका महत्वाची ठरली होती. सत्तार यांच्यामुळे कॉंग्रेसची बहुतांश मते शिवसेनेच्या पारड्यात पडल्याचे स्पष्ट झाले होते. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांना सोबत घेऊन विधान परिषदेची जागा निवडूण आणली होती. या मदतीची परतफेड तसेच शिवसेनेती एकमेव अल्पसंख्याक चेहरा म्हणून सत्तार यांचा मंत्रीमंडळात समावेश होऊ शकतो असे बोलले जाते. सहा महिन्यांनी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत देखील सत्तार यांच्यामुळे शिवसेनेच्या जागा वाढतील असा अंदाज वर्तवला जात आहे. 

महाआघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळातील मंत्र्यांची मर्यादित संख्या आणि जिल्ह्यातून असलेले स्पर्धक पाहता आपली संधी हुकू नये याची काळजी सत्तार वाहतांना दिसत आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरात अपवाद वगळता सत्तार मुंबईतच ठाण मांडून असल्याचेही दिसून आले. आता सत्तार यांची ही मुंबईवारी फळाला येणार ? की मंत्रिपद त्यांना हुलकावणी देणार हे आता लवकरच स्पष्ट होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com