शेतकऱ्यांकडील कर्जाची व वीज बिलाची सक्तीची वसुली थांबवा - अब्दुल सत्तार

शेतकऱ्यांकडील कर्जाची व वीज बिलाची सक्तीची वसुली थांबवा - अब्दुल सत्तार

औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे खरीपातील कापणीत आलेले पीक वाया गेले. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतातील विहिरी खचल्या, अनेकांच्या घरांची पडझड झाली, बऱ्याच शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, अशा वेळी महसूल प्रशासनाने पंचनामा करतांना घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंचनामा करावा. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यातून सुटणार नाही याची दक्षता घेऊन शेतकऱ्यांचे थकीत कर्ज व वीज बिल वसुलीची सक्ती तातडीने थांबवावी अशा स्पष्ट सूचना शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल प्रशासनाला दिल्या. 

मुंबईत सत्ता स्थापनेच्या सुरू असलेल्या घडामोडींमुळे शिवसेनेचे सर्व आमदार तिथेच थांबून होते. गुरुवारी सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवा, त्यांना मदत करा असे आदेश देत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी राज्यात सर्वात पहिला मोर्चा काढणारे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात येताच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर महसूल प्रशासनाशी चर्चा सुरू केली. 

सिल्लोड सोयगाव मतदारसंघात ओल्या दुष्काळामुळे झालेले नुकसान व शासनाच्या वतीने सुरू असलेल्या पंचनामा कामांचा आढावा घेण्यासाठी सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, शेतकरी या दुष्काळामुळे पुरता हवालदिल झालेला आहे. अशावेळी त्यांचे मनोधैर्य खचू नये यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. शासनाच्या गायरान जमिनी कसून उपजीविका भागविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीचे देखील पंचनामे केले जावे. 

पूर्णा नदीकाठच्या लोकांना भविष्यात जल संकटाचा धोका निर्माण होणार नाही यासाठी उपाययोजना करणे, पूर्णा नदीवरील अतिक्रमणांवर कारवाई करून या नदीत पूर्वीच्या सिंचन कामांची दुरुस्ती व नवीन सिंचन कामासाठी उपाय योजना कराव्यात. शेतकऱ्यांच्या जळालेल्या डिपी त्वरीत बदलून देण्यासंदर्भात तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचेही सत्तार यांनी यावेळी सांगितले. 

शेतकऱ्यांची अडवणूक करू नका 
शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला आहे . गेल्या दोन-तीन वर्षापासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतोय. त्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे हातची आलेली पिके उद्धवस्त झाली, अशावेळी थकीत कर्ज वसुलीसाठी बॅंक अधिकारी, वीज वितरण विभागाचे अधिकारी व सावकार कर्ज वसुलीची सक्ती करत असेल तर हे निंदनीय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून केली जाणारी सक्तीची वसुली तात्काळ थांबवा, तशा सचूना संबंधितांना द्या. शासनाच्या अनेक योजना बॅंक खात्यांशी जोडलेल्या आहेत. यात मुद्रा लोन, पिक कर्ज यासारख्या योजनेचा समावेश आहे. मात्र बॅंक अधिकारी हा लाभ शेतकऱ्यांना देत नाही. यासाठी त्वरित बॅंक अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सर्वांना शासनाचा अर्थसाह्य योजनेचा लाभ देण्याच्या सूचना द्याव्यात असेही सत्तार यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना सागितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com