ठाणे : औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करण्यात यावे, यावरून मोठा गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद समोर आले असताना भाजपकडूनही यावरुन सरकारला लक्ष्य केले जात आहे. अखेर काँग्रेसने या प्रकरणी भूमिका स्पष्ट केली आहे. महाराजांच्या नावाला विरोध नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केले.
बाळासाहेब थोरात आज ठाण्यात आले होते. त्यांनी शहरातील मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयाला भेट दिली. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व माजी आमदार मोहन जोशी, मनोज शिंदे, शहर काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे, प्रदेश काँग्रेस सदस्य राजेश जाधव आदी उपस्थित होते. या वेळी थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, संभाजीनगर विषयावर चर्चा करण्याचे कारण नाही. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. तसेच, महाराजांच्या नावाला विरोध नसून ते आमचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान आहेत.
महाविकास आघाडीमध्ये आम्हाला आमच्या पक्षाची ताकत वाढविण्यासाठी कार्यरत राहावे लागत आहे. त्यामुळे जे निर्णय होतील, त्या निर्णयांना आम्ही सर्व घटक पक्ष बंधनकारक आहोत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. संभाजी महाराजांबद्दल आम्हाला कायमच आदर आहे, आम्ही एकदम स्पष्ट भूमिका मांडली आहे. फक्त एखाद्या गोष्टीचा परिणाम चुकीच्या पद्धतीने होऊ नये एवढीच अपेक्षा आहे, असे थोरात यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असताना मंत्री व अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्याने पक्षाच्या माध्यमातून तरुणांना, नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, या मताचा मी असल्याचेही थोरात यांनी नमूद केले.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.