Congress News: काँग्रेस डेंजर झोनमध्ये ; निष्ठावंत नेता का दुखावला जातो ?

Balasaheb Thorat Latest News Update : राज्यात कॉँग्रेसमध्ये जे काही चालले आहे, ते ठीक नाही. उद्या काय होणार...
Balasaheb Thorat - Congress
Balasaheb Thorat - Congresssarkarnama

Balasaheb Thorat News Update : थोरात साहेबांचं काँग्रेसमध्ये असं होत असेल, तर या पक्षाचं काय खरंय, अशा प्रतिक्रिया सामान्य माणसांकडून सध्या कानावर पडत आहेत. जो पक्ष देशाबरोबर राज्यातही बिकट स्थितीतून जात आहे, तो जिल्ह्यात भाजपचा कसा सामना करणार, अन्‌ कसा नंबर वन होणार? सध्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्या पाहता, जिल्ह्यात काँग्रेस डेंजर झोनमध्ये आहे, असे म्हणावे लागेल.

ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, त्यांचे भाचे सत्यजीत तांबे आणि काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात कॉँग्रेसमध्ये जे काही चालले आहे, ते ठीक नाही. उद्या काय होणार, हे आज सांगता येत नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली आणि राजकारण सुरू झालं.

Balasaheb Thorat - Congress
Uddhav Thackeray: '' वाडा पडला तरी अहंकाराचा...''; थोरात-पटोले वादावरुन ठाकरे गटानं काँग्रेसचे टोचले कान

या मतदारसंघाचे गेल्या पंधरा वर्षांपासून नेतृत्व करीत असलेले डॉ. सुधीर तांबे यांना या वेळी निवडणूक लढवायची नव्हती. पुत्र सत्यजीत यांना उमेदवारी द्यावी, असे त्यांचे मत होते. तसे काही घडले नाही. जे रामायण घडायचे होते ते घडून गेले. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून न येता सत्यजीत अपक्ष लढले आणि निवडूनही आले. असो.

तर मुळ मुद्दा असा आहे, की बाळासाहेबांसारखा काँग्रेसचा निष्ठावंत नेता का दुखावला जातो? आपणास भाजपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ते विधानसभेत सर्वांत ज्येष्ठ आमदार आहेत. सातत्याने निवडून येत आहेत. कॉँग्रेस सोडण्याचे स्वप्नही त्यांनी कधी पाहिले नाही. मात्र, ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत.

Balasaheb Thorat - Congress
Pradnya Satav : महिला आमदाराच्या गालात चापट मारणारा पोलिसांच्या ताब्यात

लढवय्या संयमी नेता

२०१४ मध्ये राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींचा उदय झाला आणि काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसू लागले. भाजपने अनेक राज्यांत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. महाराष्ट्रातही तेच झाले. एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजले जाणारे हे राज्यही गेले. कॉँग्रेस संकटात असताना थोरातांनी कधीही पक्षाशी गद्दारी केली नाही.

प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेस कार्यकर्त्यांचा आधार बनले. त्यांनी ठरवलं असतं, तर तेही भाजपमध्ये जाऊ शकले असते. मोठं पदही मिळालं असतं; मात्र ते शांतपणे लढत राहिले. त्यांनी आजपर्यंत काँग्रेसमध्ये विविध पदे भूषविली. एखादा नेता जेव्हा पक्ष सोडतो, तेव्हा पक्षाचे किती नुकसान होते, हे (ते उद्धव ठाकरेंनाही विचारा) सांगण्याची गरज नाही. बाळासाहेब हे नाव महाराष्ट्राला चांगले ठाऊक आहे. ते केवळ जिल्ह्याचे नेते नाहीत. राज्याचे लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याची पक्षात जर घुसमट होत असेल, तर काँग्रेससाठी हे नक्कीच फायद्याचे नाही.

Balasaheb Thorat - Congress
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा डंका अमेरिकेतही ; टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकले बॅनर

भाजपचं मिशन

अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला, तर सर्वाधिक ताकद राष्ट्रवादी काँग्रेसची. या पक्षाचे सहा आमदार आहे. त्यानंतर भाजपचे तीन, काँग्रेसचे दोन आणि एक अपक्ष. काँग्रेसमध्ये थोरातच नाराज असतील, तर कार्यकर्त्यांनी कोणाकडे पाहायचे? जिल्ह्यात काँग्रेस कसे बाळसे धरणार? एक वर्षावर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. सामान्य कार्यकर्ते पक्षाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार? थोरात यांच्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देईल असा एकही चेहरा समोर दिसत नाही.

काँग्रेसला कसे खिळखिळे करता येईल ..

कॉँग्रेसमध्ये जे काही चालले आहे, त्याचा फटका काँग्रेसला बसला तर नवल वाटू नये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. दोन्ही काँग्रेसला कसे खिळखिळे करता येईल हे ते पाहतील. त्याची झलक नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून आली. कॉँग्रेसमध्ये काय चालले आहे, याचा अचूक वेध घेऊन खेळी केली. आज कॉँग्रेसमध्ये खदखद दिसून येत आहे. थोरातांचं जर काँग्रेसमध्ये काही खरं नसेल, तर आपण कोण, अशी भावना इतर नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये झाली, तर त्याचा फटका कॉँग्रेसला बसल्याशिवाय राहणार नाही.

दोन्ही काँग्रेसला गप्प बसून चालेल का?

देशात कितीही मोठी लाट आली, तरी काँग्रेसला संगमनेरच्या बालेकिल्ल्याला कधी तडा गेला नाही. थोरात आणि संगमनेर हे नातं वर्षानुवर्षांचं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांचे या जिल्ह्याकडे बारीक लक्ष असेल, तर दोन्ही काँग्रेसने तशी पावले टाकायला हवीत की नको? जिल्ह्यातून सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचं भाजपचं मिशन असेल, तर दोन्ही काँग्रेसला गप्प बसून चालेल का? जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतसे वातावरण तापत जाणार आहे. पुढे कोण कुठे असेल, हे काही सांगता येत नाही. आज जे ज्या पक्षात आहेत, ते त्या पक्षात असतीलच हे काही सांगता येणार नाही. आज जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला, तर कॉँग्रेस डेंजर झोनमध्ये आहे, हे मात्र नक्की!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com