गणेश नाईकांना धोक्‍याची घंटा; ऐरोली-बेलापूरमधून शिवसेनेला सर्वाधिक मतदान 

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या सलग दुसऱ्या तगड्या विजयामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नेतेमंडळींना अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे.
गणेश नाईकांना धोक्‍याची घंटा; ऐरोली-बेलापूरमधून शिवसेनेला सर्वाधिक मतदान 

नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या सलग दुसऱ्या तगड्या विजयामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नेतेमंडळींना अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे.

एकेकाळी राष्ट्रवादीच्या गणेश नाईकांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईतून तब्बल दोन लाख दहा हजार मते विचारेंना मिळाल्यामुळे हा बालेकिल्ला अडचणीत आला आहे. या निवडणुकीत नवी मुंबईतील राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नेते मंडळींची दिलजमाईदेखील नाईकांनी करून आणली होती. मात्र ऐन वेळेला नाईकांनी दिलेली आर्थिक रसद कॉंग्रेसच्या नेतेमंडळींना अखेरपर्यंत न मिळाल्यामुळे शेवटच्या क्षणाला मते फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

2014 च्या निवडणुकीतही विचारे यांचा दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्‍याने विजय झाला होता. त्या वेळी मोदी लाटेमुळे हे शक्‍य झाल्याची टिपण्णी विरोधकांनी करून आपला नाकर्तेपणा झाकण्याचा प्रयत्न केला होता; परंतु आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उलट वातावरण असतानाही विचारे पुन्हा दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्‍य घेऊन विजय झाल्याने नाईकांसाठी येत्या विधानसभेला धोक्‍याची घंटा वाजली आहे. 

विचारे यांना मिळालेल्या 7 लाख 40 हजार 969 मतांमध्ये सर्वाधित मते ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मिळालेली आहेत. ऐरोलीतून एक लाख सात हजार 767; तर बेलापूर मतदारसंघातून एक लाख 3 हजार 164 मते विचारे यांना मिळाली आहेत. 

ऐरोलीत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संदीप नाईक असताना एवढ्या मोठ्या मतांची आघाडी शिवसेनेच्या उमेदवाराला मिळणे म्हणजे कॉंग्रेसच्या मतांचाही यात समावेश असल्याचे ऐरोलीत बोलले जात आहे. बेलापूरमध्येही एक लाखांहून जास्त मते विचारेंना मिळाल्यामुळे बेलापूरमधील येत्या विधानसभेतील आमदार मंदा म्हात्रे यांचे स्थान अधिक भक्कम झाल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. लोकसभा निवडणूक ही पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेची रंगीत तालीम असल्याने या निवडणुकीतील चुकांमधून तरी राष्ट्रवादीचे नेते काही बोध घेतील का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. 

कॉंग्रेसचीही मते शिवसेनेला
विळ्या-भोपळ्याचे नाते असलेल्या नवी मुंबईतील कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींचे मनोमीलन झाले होते. ते आर्थिक रसद व विधानसभेच्या मदतीच्या वाटाघाटीवर अवलंबून होते. त्यानुसार राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी बिदागीही कॉंग्रेसला अदा केली होती; मात्र ती अखेरपर्यंत कॉंग्रेसच्या नेत्यांना न मिळाल्यामुळे नाराज कॉंग्रेसच्या नेते मंडळींनी आयत्या वेळी त्यांची मते शिवसेनेच्या उमेदवाराला फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com