विदर्भात दानवेंच्या विरोधात शिवसेना आक्रमक; कॉंग्रेस मात्र शांत! 

विदर्भात दानवेंच्या विरोधात शिवसेना आक्रमक; कॉंग्रेस मात्र शांत! 

नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झालेली असताना विदर्भात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीवर मात्र शांतता आहे. 

रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल काढलेल्या अपशब्दानंतर निषेध करण्यासाठी विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. यात शिवसेनेचे कार्यकर्ते आघाडीवर आहे. यवतमाळमध्ये दानवेंच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढण्यात आली. अकोला चंद्रपूरमध्येही दानवेंच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात असताना आज नागपूरच्या शिवसैनिकांतर्फे दानवे यांच्या प्रतिमेला चपलांचा मार देऊन व काळे फासून तीव्र निषेध व्यक्त केला. 

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मात्र अद्याप घराबाहेर पडलेले नाहीत. नागपुरात एकही आंदोलन झाले नाही. महाराष्ट्र महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस यांनी निषेधाचे पत्रक वर्तमानपत्रांना पाठविले. टोकस यांचे हे निषेधाचे पत्रक वगळल्यास एकाही कॉंग्रेस नेत्याने निषेध करण्याचे धैर्य दाखविले नाही. विदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे फारच कमी आमदार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनीही दानवेंच्या वक्तव्यावर शांत राहणे पसंद केले आहे. 

दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही लोकांचा रोष कमी झालेला नाही. दानवेंचा निषेध करण्याचे कार्यक्रम सुरूच आहेत. नागपूर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश हरडे, ग्रामीणचे जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार व ग्रामीण जिल्हा प्रमुख राजू हरणे यांच्या नेतृत्वात एसटी स्टॅंड चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेला काळे पोतून चपलांचा मार दिला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली. 

या वेळी बोलताना जिल्हा प्रमुख सतीश हरडे म्हणाले, शिवराळ भाषा बोलणे आता भाजप नेत्यांची संस्कृती झाली आहे. शेतकऱ्यांचे भले व्हावे, असे त्यांना वाटत नाही. या नेत्यांना माज चढला असून हा माज शेतकऱ्यांची मुले उतरवतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

बाजार समितीच्या शासकीय केंद्रावर नवीन तूर आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हवामानात बदल होत असल्याने खरेदी लवकरात लवकर सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. खरेदी झालेली तूर गोदामांत पाठविण्यास गती आणली असल्याचे अशोक देशमुख यांनी सांगितले. जागा मोकळी झाल्याशिवाय नवीन खरेदी करता येणे शक्‍य नाही. तिवसा व भातकुली या तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तूर अमरावतीच्या केंद्रावर आणावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com