देशात सध्या "मेरी मर्जी' सुरू आहे, उद्धवांची टीका

देशात सध्या "मेरी मर्जी' सुरू आहे, उद्धवांची टीका

मुंबई : देशाला स्थिर सरकार मिळाले असले, तरी देश अस्थिर झाला आहे. "मेरी मर्जी' असा सगळा कारभार सध्या सुरू आहे. देश स्थिर करायचा असल्यास अस्थिर सरकार यायला हवे. देशाला शिवशाही हवी आहे, हुकूमशाही नको; अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 

मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, देशाला आघाडीच्या सरकारची नव्हे; तर मजबूत सरकारची गरज होती. स्थिर सरकारच्या वेडापायी प्रचार केला; पण आता देशात स्थिर सरकार असले तरी देश अस्थिर झाला आहे. सरकार अस्थिर असल्यास सर्वांना विचारात घेऊन निर्णय होतात; पण आता एकांगी निर्णय होत आहेत. प्रत्येकाने शेळ्या-मेंढ्यांसारखे त्यांच्या मागे जावे अशी परिस्थिती आहे. 

मराठीची सक्ती करता येणार नाही असे विधान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अलीकडेच केले होते. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनीही अलीकडेच कानडी भाषेचे कौतुक केले होते. तो धागा पकडून ठाकरे म्हणाले, "मराठी भाषेचा अभिमान बाळगता येत नसल्यास या मातीत जन्मलेल्या शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नका. कर्नाटकमध्ये काणतेही सरकार आले, तरी ते त्यांच्या मातृभाषेशी तडजोड करत नाही; पण आम्ही नेळभट आहोत. 

एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत आहेत. पेपर फुटत आहेत आणि सरकार इंद्रीयसुखाचे धडे देत आहे. अशा अवस्थेत आपण मराठी भाषा दिन साजरा करत आहोत. राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी भाषेतील अनुवाद का झाला नाही, याबाबत फुटकळ कारणे दिली जात आहेत. पूर्वी मराठी मंत्रालयाच्या दारात उभी असायची; आता तिला दारातून परत पाठवले जाते, अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले. 

तुमचा नाकर्तेपणा आमच्या गळ्यात नको! 
शिवसेनेने आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असा चिमटा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी काढला होता. त्यावर "तुमचा 50 वर्षांचा नाकर्तेपणा आमच्या गळ्यात मारू नका. तुम्ही मुख्यमंत्रिपद भूषवले होते. केंद्रात मंत्रीही होतात; मग आरक्षणाच्या नावावर समाजात जातीपातीच्या भिंती का उभ्या केल्या, असा प्रश्‍न त्यांनी विचारला. 

"अभिजात'साठी रान उठवणार 
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल भाष्य केले होते. त्यावरूनही ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. मराठीच्या अभिजात दर्जासाठी दिल्लीच्या मर्जीवर राहावे लागते. मराठी भाषेला अभिजात दर्जाची गरज नाही; पण जे हवे आहे ते मिळवणारच. त्यासाठी शिवसेना संसदेच्या अधिवेशनात सरकारविरोधात रान उठवणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. 

आपल्या उंचीचा विचार करा! 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी "राजा, तू चुकत आहेस; तू सुधारायला हवे', अशी भूमिका मांडली होती. त्यावर भाजप खासदार पूनम महाजन यांनी, राजा काय करतोय, या भानगडीत साहित्यिकांनी पडू नये असा सल्ला दिला होता. त्यावर "आपली उंची किती आणि साहित्यिकांची उंची किती याचा विचार करा', असा टोला ठाकरे यांनी महाजन यांना लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com