"मोदी-शहा भक्तां'नी माझा अपमान करू नये - किशोर तिवारी

 "मोदी-शहा भक्तां'नी माझा अपमान करू नये - किशोर तिवारी

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात खोटे आरोप व ईडीच्या माध्यमातून त्यांना त्रास दिल्यास भाजपला अडचणीचे होईल, असा इशारा राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे नेतृत्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देण्याच्या वाढत्या मागणीनंतर आता भाजपमधून वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्यावर टीका सुरू झाली आहे. भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी किशोर तिवारी यांच्यावर टीका केली आहे. यानंतर पुन्हा किशोर तिवारी यांनी प्रसिद्ध पत्रक काढून आपली भूमिका मांडली आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. समाजाच्या सर्व वर्गामध्ये विश्‍वासाचे नाते निर्माण करण्यासाठी मवाळ व ग्रामीण अर्थव्यवस्थेची जाणकर असलेल्या नेत्याची आवश्‍यकता असल्याने, भाजपचे नेतृत्व नितीन गडकरी यांच्याकडे द्यावे, अशी मागणी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याकडे तिवारी यांनी केली आहे. या मागणीनंतर माझ्यावर टीकेची झोड उठविली जात असल्याचा आरोप करून तिवारी यांनी पत्रकात म्हटले आहे की, यात देशातील "मोदी-शहा भक्तां'चा समावेश आहे. आपण भाजपचे सदस्य नाही. गडकरींना नेतृत्व सोपवावे, हे आपले व्यक्तीगत मत आहे. 

विदर्भात गेल्या 25 वर्षांपासून मी शेतकरी व आदिवासी क्षेत्रात काम करीत आहे. पक्षात मवाळ नेतृत्व आल्यास देशातील अल्पसंख्याक समाज पुन्हा भाजपकडे येईल. या आपल्या खुल्या चर्चेला काही जणांनी विकृत रुप देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आपण व्यथीत झालो आहे. मोदी-शहा भक्तांनी आपला अपमान करू नये, असा सल्ला तिवारी यांनी दिला आहे. 

या पत्रामुळे नितीन गडकरीच "अडचणी'त येतील, त्यांच्यावर 2012 सारखे खोटे आरोप व ईडीचा त्रास सुरू होईल, अशी भीती काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. असा प्रकार झाल्यास भाजपच्या अडचणीत वाढ होईल, असा इशारा तिवारी यांनी दिला आहे. परंतु माझ्या पत्रानंतर काश्‍मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या भूमिकेचे समर्थन केले आहे. यामुळे पक्षाला गडकरींचा नेतृत्व मान्य असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी पत्रकात केलाय. 

गडकरींना नेतृत्व सोपविण्यासाठी आपल्याला सुपारी दिल्याचा काही जणांचे आरोप हास्यास्पद असल्याचे सांगून नमूद करून ते म्हणाले, माझे वडील जनसंघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. आणिबाणीच्या काळात मिसाखाली त्यांना अटक झाली होती. शेतकरी मिशनचा अध्यक्ष म्हणून गेल्या सहा वर्षात राज्यात सतत फिरून लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाची सत्ता चालविणाऱ्या नेत्यांच्या अहंकाराच्या व हुकूमशाही पद्धतीने काम करणाऱ्या नेत्याच्या कार्यशैलीवर नाराजी मोठ्या प्रमाणात समोर आली आहे. आपल्या अनाहूत सल्ल्यामुळे ज्या परिजनांच्या भावना दुखावल्या त्यांच्या प्रती दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com