मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेगाने हालचाली सुरू 

मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेगाने हालचाली सुरू 

मुंबई ः लोकसभा आणि विधानसभा 2019 ला अद्याप दोन-अडिच वर्षांचा कालावधी बाकी आहे. मात्र भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या सत्तेतील भागीदार पक्षांना या निवडणुकीचे वेध लागले आहे.

या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दोन्ही पक्षाकडून लवकरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालट केला जाणार आहे. या विस्तारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील काहींना निश्‍चित डच्चू दिला जाणार आहे. तर काहींची बढती मिळणे अपेक्षित आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या एका वजनदार नेत्यांचा भाजप प्रवेश असल्याने हा विस्तार लांबल्याचे समजते. 

राज्यात भाजपा- शिवसेना या दोन पक्षाचे सरकार असले तरीही एकमेकावर कुरघोडी करण्याची संधी हे दोन्ही पक्ष सोडत नाहीत. भाजपाने देशपातळीवर 2019 ची तयारी सुरू केली आहे. याची नोंद घेत शिवसेनेनेही त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना लोकसभा आणि विधानसभांच्या आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सुमार कामगिरीच्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागणार आहे. शिवाय ज्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना घरी बसवावे लागणार आहे. कारण "पारदर्शक कारभार' या मुद्यावर भाजपाने जनतेवर भुरळ पाडली आहे. तसेच या दिड वर्षांत दमदार कामगिरी केली तरच पुन्हा सत्तेवर येणे सोपे जाणार आहे, याचे भान भाजपा नेतृत्वाला आहे. तर शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे यापुढील काळात लढावयाच्या आहेत याचे भान आले आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार करताना ग्रामीण भागातील तसेच थेट जनतेतून निवडूण आलेल्या सदस्यांना मंत्री करणे गरजेचे असल्याचे समजून चुकले आहे. 

तसेच विधान परिषदेचे सदस्य असलेल्या सदस्यांना कॅबिनेट खात्याचे मंत्री केल्याने शिवसेनेच्या विधान सभेतील आमदारांत खदखद आहे. तसेच उदयोगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर विरोधकांनी आरोप केले आहेत. त्यांना बाहेर काढले जावे, ही शिवसेनेच्या अनेक आमदारांची इच्छा आहे. ही खदखद दूर करून पुढील निवडणुकांत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार शिवसेनेसाठीही महत्वाचा आहे.

भाजपा-शिवसेना मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. केंद्रातील सरकारचा विस्तार झाल्यानंतर लगेच राज्यातील विस्तार होणार आहे. हा विस्तार आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळयासमोर ठेवूनच होणार आहे. 

कॉंग्रेसच्या एका वजनदार नेत्यांमुळे विस्तार लांबल्याची शक्‍यता 
कॉंग्रेस पक्षाचा कोकणातील एक वजनदान नेता भाजपमध्ये येण्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून रंगली आहे. या नेत्यांचा रितसर भाजपत प्रवेश लवकरच होईल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. येत्या 27 तारखेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यादरम्यान या नेत्याचा प्रवेश होईल, असे मानले जाते. या नेत्याची दोन मुले ही भाजपत येणार आहेत. त्यांचे राजकीय पुनर्वसन करताना या वजनदार नेत्याला राज्यातील मंत्रिमंडळात स्थान द्यायचे की दिल्लीला पाठवायचे या कोंडीत भाजप सापडला आहे.

जर हा नेता राज्यात ठेवला तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांना स्थान द्यावे लागेल. असे स्थान दिले तर डोकेदुखी वाढेल. त्यामुळे त्यांना दिल्लीला राज्यसभेत धाडणे हा एक विचार भाजप करीत आहे. या नेत्याच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे देखील मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याचे सांगितले जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com