शिवसेना डरपोक लोकांचा पक्ष : नारायण राणे 

शिवसेना डरपोक लोकांचा पक्ष : नारायण राणे 

मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांवर या सरकारने संकट उभे केलेले आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या कचाट्यात सापडून आत्महत्या करत असतानाही सरकार जागे होत नाही. त्यासाठी राज्यातील सर्व विरोधी पक्ष, संघटनांनी सरकारविरोधातील संघर्षांसाठी तयार व्हावे, असे आवाहन करतानाच शिवसेना हा डरपोक लोकांचा पक्ष असल्याची टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केली. 

शेतकऱ्यांच्या न्याय हक्‍कासाठी कोकणातील प्रत्येक शेतकरी, नागरीक या संघर्षात सहभागी होतील असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. 
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप आदी पक्षाकडून रायगड ते बांद्यापर्यंत आज (ता.17) काढण्यात आलेल्या चौथ्या आणि अखेरच्या संघर्ष यात्रेदरम्यान सावर्डे येथे एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राणे यांनी सरकारवर तोफ डागली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार नितेश राणे आदी नेत्यासह दोन्ही पक्षाचे 40 हून अधिक आमदार या सभेला उपस्थित होते. 

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून ते राज्याच्या संयुक्‍त महाराष्ट्राच्या लढयापर्यंत कोकणातील माणसांनी मोठे योगदान दिलेले आहे. यात अनेकदा कोकणी माणूस हा अग्रभागी होता. कोकणी माणसानी कधीही आपल्याला वेगळा कोकण मागितला नाही, परंतु राज्यातील अनेक प्रश्‍नावर तो लढत राहिला आहे. आता संघर्ष यात्रा उद्या संपेल मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष पुन्हा तीव्र केला पाहिजे. केंद्र सरकारला आता तीन वर्षे झाली असली तरी त्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविलेले नाही असे जोरदार टीकास्त्र राणे यांनी सरकारवर सोडले. राणे म्हणाले, ""शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपेक्षा हे सरकार जीएसटीला महत्व देत आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. तर दुसरीकडे मातोश्रीवर अर्थमंत्री गेले तेंव्हा त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत जाब का विचारता आला नाही. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली आहे. शिवसेना डरपोक लोकांचा पक्ष आहे.'' 

रत्नागिरी जिल्हाचा विकास करायचा असेल तर या जिल्ह्यातून शिवसेनेला साफ करावे असे आवाहनही त्यांनी विरोधीपक्षांना केले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सर्व दिग्गज नेत्यांनीही सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेवर जोरदार टीका केली. संघर्ष यात्रेचा हा अखेरचा टप्पा असला तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपला हा संघर्ष यापुढेही कायम असेल असे आश्‍वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात यावेळी आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com