दापोलीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना-काँग्रेसचा 'प्रासंगिक करार' कायम

दापोली नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या 24 जून रोजी होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना व कॉंग्रेस यांनी गेल्या अडीच वर्षातील प्रासंगिक करार तसाच पुढे अडीच वर्षासाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने राष्ट्रवादीचे दापोली नगराध्यक्षपदाचे स्वप्न भंगण्याचीच शक्‍यता अधिक आहे.
दापोलीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना-काँग्रेसचा 'प्रासंगिक करार' कायम

दाभोळ : दापोली नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या 24 जून रोजी होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना व कॉंग्रेस यांनी गेल्या अडीच वर्षातील प्रासंगिक करार तसाच पुढे अडीच वर्षासाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने राष्ट्रवादीचे दापोली नगराध्यक्षपदाचे स्वप्न भंगण्याचीच शक्‍यता अधिक आहे.

दापोली नगरपंचायतीमध्ये 17 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे सर्वाधिक म्हणजे 7, भाजपाचे 2, कॉंग्रेसचे 4 व राष्ट्रवादीचे 4 असे संख्याबळ आहे. 2014 मध्ये शिवसेना व कॉंग्रेस यांनी एकत्र येत राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम व कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्या पुढाकाराने युती करून एक वेगळे राजकीय समीकरण तयार केले. या समीकरणाला प्रासंगिक करार, असे नाव देण्यात आले होते. या प्रासंगिक करारावर वेळोवेळी टीका झाली. कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नाराजी देखील व्यक्‍त केली. मात्र, कॉंग्रेसचे स्थानिक नेते आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रदेश पातळीवरून शिवसेना व कॉंग्रेस यांची ही युती संपुष्टात आणावी, असा आदेश देखील आला. 

कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनीही अशाप्रकारची युती कॉंग्रेसला मान्य नसल्याचे सांगितले. मात्र, त्यांचा आदेशही दापोलीमध्ये मान्य करण्यात आला नाही. नगराध्यक्षपद पुढील अडीच वर्षासाठी ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. कॉंग्रेसकडे या पदासाठी दावेदार नाही. शिवसेनेकडे परवीन शेख या एकमेव महिला नगरसेवक दावेदार आहेत. प्रासंगिक करार कायम राहिल्यास परवीन शेख नगराध्यक्ष होतील. राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्याशी संपर्क साधला असता, राज्यस्तरावर कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी आहे. मागील वेळी कॉंग्रेसने केलेली चूक पुन्हा ते करणार नाहीत, असा आपला ठाम विश्‍वास असून दापोली शहरामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली असून लोकसभा निवडणुकीमध्ये त्याची झलक पहावयास मिळाली आहे. यापुढेही नगरपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याने राष्ट्रवादी त्यावेळी निश्‍चितच योग्य विचार करेल, असे सांगितले.

भाजप योग्यवेळी योग्य निर्णय घेईल
याबाबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांच्याशी संपर्क साधला असता, राज्यस्तरावर असलेली युती दापोलीत असावी, असे शिवसेनेला वाटत नाही. त्यामुळेच अडीच वर्षापूर्वीही त्यांनी आमच्याकडे कोणताही संपर्क साधला नव्हता व यावेळीही त्यांनी संपर्क साधला नाही. भाजपा योग्यवेळी योग्य निर्णय घेईल असे सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com