AJIT-PAWAR
AJIT-PAWAR

शिवसेना- भाजपचे सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा : अजित पवारांची नाशिकात बॅटिंग

चुलत्याच्या पुण्याईने बरं चाललंयराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्याचे ठिकाण अनेक कार्यकर्ते उभे होते. याचा उल्लेख करीत पवार म्हणाले, " अनेक कार्यकर्ते उभे आहेत, पण रंजन ठाकरे व रवींद्र पगार बसलेले असल्याने आम्ही बसलो, नाहीतर आम्हीही उभे राहिले असतो. तुम्हाला चांगली जागा मिळाली नाही का? मला माहित आहे, समस्या असतात. माझ्याही नाशिकमध्ये काही ओळखी आहेत. तुम्ही मला फोन केला असता, तर मी केली असती काहीतरी व्यवस्था. चुलत्याच्या पुण्याईने माझे बरे चालले आहे" , असे म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.अजित पवारांची फटकेबाजी* ठाकरेंना शेतीतील किती कळते असे विचारले की, त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबतात.* एकिकडे सत्ता भोगायची आणि दुसरीकडे सरकारच्या विरोधात असल्याचे सांगायचे हे शिवसेनेचे दुटप्पी राजकारण* उद्धव ठाकरेंना माझ्या तोंडात कुठे भ्रष्टाचाराचा बोळा दिसला, इकडे येऊन बघा माझ्या तोंडात दात आणि जीभ आहे .* उद्धव ठाकरेंनी कर्जाबाबत सभा घेऊन शेतकऱ्यांना हात वर करण्यास सांगण्यापेक्षा त्यांच्या मंत्र्यांना मंत्रीमंडळाच्या बैठकीत हात वर करायला सांगितले पाहिजे* मला अजीत पवार गट करायचा नाही, तर राष्ट्रवादी पक्ष मोठा करायचा आहे* पक्षामुळे 15 वर्षे सत्ता भोगलेल्यांनी आता पक्षासाठी वेळ दिला पाहिजे

नाशिक  :   " राज्यातील भाजप- शिवसेनेचे सरकार म्हणजे सावळा गोंधळ बरा असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. सतत निर्णय बदलणारे व एकमेकांशी भांडण्याची नौटंकी करणारे शिवसेना- भाजपचे सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे ", अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-शिवसेना यांच्यावर कोरडे ओढले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आज तुपसाखरे लॉन्स येथे झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावतानाच श्री. पवार यांनी शिवसेनेची दुटप्पी भूमीका व सरकारच्या चुकीच्या निर्णयांवर कठोर शब्दात टीका केली.

श्री. पवार म्हणाले, "हे सरकार कुणालाच आपले वाटत नसल्याने सर्व घटकांमध्ये सरकारविषयी अस्वस्थता आहे. निव्वळ घोषणाबाजी करणारे हे सरकार अंमलबजावणीच्या पातळीवर काहीही काम करीत नाही. हे सरकार निर्णयांवर ठाम राहू शकत नाही. कर्जमाफीचाच निर्णय घ्या, यासाठी आम्ही विधिमंडळ अधिवेशनात मागणी केली, तेव्हा योग्य वेळी कर्जमाफी जाहीर करणार असल्याचे आणि अभ्यास सुरू असल्याचे सांगितले. "

मात्र, संघर्ष यात्रा, आसूड यात्रा, आत्मक्‍लेश यात्रेनंतर शेतकऱ्यांच्या संपामुळे या सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे इतिहासात शेतकरी पहिल्यांदा संपावर गेला. सरकारने कर्जमाफी करताना तातडीची दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली. परंतु, अद्याप कुणालाही मदत मिळाली नाही. कर्जमाफी जाहीर केल्यानंतर सरकार रोज निर्णय बदलत आहे. यामुळे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनाही कोणता निर्णय मानावा, हे समजत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. कर्जमाफी फसवी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ढोल कसले वाजवता?

" सरकारमध्ये सहभागी असूनही शिवसेनेने कर्जमाफीच्या याद्या मिळवण्यासाठी बॅंकांसमोर ढोल वाजवले. कर्जमाफीचे निर्णय घेताना व निकष ठरवताना शिवसेनेचे मंत्री मंत्रीमंडळाच्या बैठकीत हजर होते. तेथे गप्प बसायचे व इकडे ढोल वाजवायचे. ढोल कसले वाजवता, त्यापेक्षा शिवसेना व भाजपची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या 60 हजार कोटींच्या ठेवी राज्यशासनाला कर्जमाफीसाठी ठराविक व्याजदराने द्या, मग तुमचे शेतकरी प्रेम लोकांना कळेल" , अशा शब्दात त्यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.

पुनर्गठण केलेल्यांना द्या कर्जमाफी

" सततच्या दुष्काळामुळे मागील वर्षी जे शेतकरी कर्जाची परतफेड करू शकत नव्हते, त्यांच्या कर्जाचे सरकारने मागील वर्षी पुनर्गठण केले. या वर्षी कर्जमाफी करताना मात्र त्यांना वगळले आहे. पुनर्गठण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली नव्हती, तरीही सरकारने पुनर्गठण केले. यामुळे ते शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याने सरकारने पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांचेही कर्ज माफ करावे, अशी मागणी पवार यांनी केली. कर्जमाफीची गरज नसलेल्या शेतकऱ्यांना जरूर वगळा, आमचे काहीही म्हणणे नाही, पण एकही गरजू या कर्जमाफीपासून वंचित राहता कामा नये,"  असा इशारा त्यांनी सरकारला दिला.


ते माझ्या मनात नाही

शेतकरी कर्जमाफीचा किती शेतकऱ्यांना फायदा झाला, या विषयावर पवार बोलत असताना व्यासपीठावरून कुणीतरी आकडे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पवार म्हणाले, अहो तुम्ही कशाला आकडा लावताय? तो सरकारला जाहीर करू द्या. आपल्याला जिंकणारा आकडा लावायची सवय आहे, असे म्हणताच कार्यकर्ते हसू लागल्यानंतर त्यांनी तुमच्या मनात जे आहे, ते माझ्या मनात नाही, हे लक्षात ठेवा, असे स्पष्ट केले. 

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार हेमंत टकले, पंकज भुजबळ, जयंत जाधव, नरहरी झिरवाळ, दीपिका चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा  स्मीता पाटील, विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम पाटील, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, श्रीराम शेटे, दिलीपराव बनकर, यतिंद्र पाटील, विजयश्री चुंभळे, रत्नाकर चुंभळे, कोंडाजीमामा आव्हाड, डॉ. भारती पवार, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, गजानन शेलार आदी उपस्थित होते.
 प्रदेशाध्यक्ष तटकरे, महिला अध्यक्षा वाघ, ऍड. पगार, श्री. शेलार यांचीही या वेळी भाषणे झाली. शहराध्यक्ष ठाकरे यांनी प्रास्ताविक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com