केंद्रातील सरकार रात्रंदिवस काम करतयं, सीबीआय प्रकरणावरून शरद पवारांचा मोदी सरकारला टोला

केंद्रातील सरकार रात्रंदिवस काम करतयं, सीबीआय प्रकरणावरून शरद पवारांचा मोदी सरकारला टोला

औरंगाबाद : सीबीआयचे संचालक व विशेष संचालक यांच्या बदली प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी " केंद्र सरकार रात्रंदिवस काम करतयं' असा टोला लगावला. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असे सांगितले जातेयं, त्यांनी चुकीचे काम केलेही असेल पण मग त्यांची निवड कोणत्या निकषावर केली असा सवाल करत या गंभीर विषयावर अर्थमंत्र्यांऐवजी पंतप्रधानांनी बोलायला हवे होते असे स्पष्ट मत व्यक्त केले. 

औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलतांना शरद पवारांनी सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा संदर्भ देत मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. सीबीआयच्या संचालकांची निवड करण्याचा अधिकार अर्थमंत्र्यांचा नाही, तो पंतप्रधानांचा असतो. त्यामुळे या वादावर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केलेले निवेदन मी ऐकले. पण या विषयावर पंतप्रधानांनीच बोलायला हवे होते. 

ज्या राज्यात देशाचे प्रमुख अनेक वर्ष मुख्यमंत्री होते. त्या राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवड नंतर त्यांच्याकडून करण्यात आली. त्यामुळे सीबीआयच्या प्रकरणात अधिकाऱ्यांचा दोष किती यापेक्षा त्यांची निवड कोणत्या निकषावर केली. अशा प्रकारच्या कारावायांमुळे प्रशासकीय यंत्रणा कोलमडेल, त्यांची किंमत सर्वसामान्य लोकांना मोजावी लागेल असा इशारा देखील शरद पवारांनी दिला. 

भाजपचे माजी मंत्री यशवंत सिन्हा आणि अरूण शौरी यांनी सीबीआयकडे  राफेल प्रकरणात तक्रार दिली होती हे मला माहिती आहे. त्याचा ड्राफ्ट देखील मी वाचला होता. पुढे त्याचे काय झाले हे मला माहित नाही असे सांगत सीबीआय मध्ये सुरू असलेल्या गोंधळामागे राफेलमधील भ्रष्टाचार हेच कारण असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले. 

विकासाच्या स्वप्नाचे काय झाले? 
केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात लढतांना राष्ट्रीय पातळीवर एकच धोरण स्वीकारणे शक्‍य नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. प्रत्येक राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तामिळनाडूत डीएमके, कर्नाटकात देवेगौडांचा पक्ष, तर पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशात चंद्रबाबूंचा पक्ष प्रबळ आहे. या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यानंतरच अंतिम धोरण ठरवता येईल असे शरद पवारांनी सांगितले. 

भाजप सरकारकडे सध्या सांगण्यासारखे काहीच नाही, साडेचार वर्षात विकास कुठे गेला? विकासाच्या स्वप्नाचे काय झाले ? असा टोला लगावतांनाच देशावर एकाच परिवाराने राज्य केले हे किती काळ सांगणार असा सवाल त्यांनी केला. पण त्यांचे योगदान होते, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी केलेला त्याग दुर्लक्षित करता येणार नाही असेही शरद पवारांनी सांगितले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com