अयोध्येतील राम मंदिर निर्माणात कॉंग्रेसकडूनच अडथळा - हुकूमचंद सावला

 अयोध्येतील राम मंदिर निर्माणात कॉंग्रेसकडूनच अडथळा - हुकूमचंद सावला

औरंगाबाद : आयोध्येत 1992 मध्ये पाडली गेली ती मशीद नव्हतीच. बाबराने राम मंदिर पाडून बांधलेला तो एक ढाचा होता. 1984 पूर्वी राम मंदिर जन्मभूमीबद्दल कुठलाच वाद नव्हता. पण कॉंग्रेसने बाबरी मशीद ऍक्‍शन कमिटी स्थापन करत राम मंदिरांचा प्रश्‍न चिघळवला. आजही राम मंदिराचा प्रश्‍न 2019 पूर्वी निकाली निघू नये यासाठी पेशाने वकील असलेले कॉंग्रेसचे नेतेच सर्वोच्च न्यायालयात आपली शक्ती पणाला लावत आहेत. आयोध्येतील राम मंदिर निर्माणात कॉंग्रेस हाच प्रमुख अडथळा असल्याचा आरोप विश्‍व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हुकूमंचद सावला यांनी केला. 

आयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी केद्र सरकारने कायदा करावा या मागणीसाठी विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने देवगिरी प्रांतमध्ये "हुंकार' सभेचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबादेतील संत तुकाराम सिडको नाट्यगृहात आयोजित हुंकार सभेत आयोध्येत राम मंदिरच होते याचे दाखले देतानांच केंद्र सरकारने राम मंदिर निर्माणासाठी कायदा करून या मार्गातील सर्व अडथळे दूर करावेत असे आवाहन देखील सावला यांनी केले. राम जन्मलाचा नाही अस म्हणणारे आज मंदिरात जाऊन मतांची भीक मागत असल्याचा टोलाही त्यांनी कॉंग्रेसला लगावला. 

बाबरी मशीद हिंदूस्थान मे कभी नही.. 
अयोध्येत मशीद कधीच नव्हती हे सिध्द झाले आहे, रामाचा जन्म अयोध्येतच झाला हे सुप्रीम कोर्टाने देखील मान्य केले आहे, त्याबद्दल त्यांचे आभारच मानावे लागतील. राम अयोध्येतच जन्मले याचा दाखला 18 पुराणांमध्ये आहे. राम मंदिर हा आमच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे आस्थेचा निर्णय न्यायालये किंवा विज्ञान करू शकत नाही. हनुमानाने हुंकार दिला तेव्हा लंका जळाली होती, राम मंदिरासाठी आता हिंदूंनी हुंकार दिला आहे, त्यामुळे अयोध्येत राम मंदीर बनवण्यापासून जगाची कुठलीही शक्ती आता आम्हाला रोखू शकत नाही असा इशारा देखील सावला यांनी दिला. "मंदिर वही बनायेंगे, मशिद नही, बाबरी मशीद हिंदूस्थान मे कभी नही' असा हुंकार देखील त्यांनी या सभेत भरला. 

बाबराच्या शासन काळात आयोध्येतील राम मंदिर पाडण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा राम मंदिर बांधण्याची जबादारी सरकारची आहे, आणि राम मंदीर सरकारच बांधेल असा दावा करतांनाच दिल्लीतील सत्तेचा मार्ग आता व्हाया आयोध्याच असेल असा सूचक इशारा हुकूमचंद सावला यांनी यावेळी दिला. 

राम जन्मभूमीचे विभाजन मान्य नाही... 
अयोध्येतील राम जन्मभूमीची संपूर्ण सत्तर एकर जागा आम्हाला हवी आहे, राम जन्मभूमीचे विभाजन कदापी मान्य करणार नाही असे ठणकावून सांगतानाच अयोध्येत 270 फूट लांबी, 150 फूट रुंद, 132 फुटावर कळस, 13 मजली, साडेसोळा फुट उंच असलेल्या 106 खांबाचे भव्य मंदिर आयोध्येत उभारले जाणार आहे. मंदिराच्या शीला कधीच तयार झाल्या आहेत, तेव्हा पुढची रामनवमी आपण आयोध्येत साजरी करू असा विश्‍वास देखील सावला यांनी व्यक्त केला. सरदार वल्लभभाई पटेल देशाचे गृहमंत्री असतांना त्यांनी सोमनाथ मंदिर बनवले होते. पंडीत जवाहरलाल नेहरूच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंदिराचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. मग आताच्या सरकारला राम मंदिराचा कायदा का करता येत नाही ? जर सोमनाथ मंदिराच्या कायद्याला कॉंग्रेसच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळूनही ते जातीयवादी ठरले नाही, तर मग राम मंदिरासाठी आताच्या सरकारने कायदा केला तर ते जातीयवादी कसे ठरेल असा सवालही हुकूमचंद सावला यांनी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com