सदाभाऊ संकटातून अधिक संकटाकडे 

कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरील संकटे दिवसेंदिवस वाढू लागली आहेत. मुलाचा अपघात, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत मुलाचा झालेला पराभव, मंत्रिपद घेतले आणि त्यांना आजारपण मागे लागले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांच्यावर झालेले आरोप, त्यातून संघटना सोडायला लागणे आणि आता एका महिलेने त्यांच्यावर केलेला आरोप अशी एकामागून एक संकटे सदाभाऊंच्या मागे लागली आहेत.
सदाभाऊ संकटातून अधिक संकटाकडे 

सातारा : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरील संकटे दिवसेंदिवस वाढू लागली आहेत. मुलाचा अपघात, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत मुलाचा झालेला पराभव, मंत्रिपद घेतले आणि त्यांना आजारपण मागे लागले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांच्यावर झालेले आरोप, त्यातून संघटना सोडायला लागणे आणि आता एका महिलेने त्यांच्यावर केलेला आरोप अशी एकामागून एक संकटे सदाभाऊंच्या मागे लागली आहेत. 

खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या दोन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी भाजप सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतला. राजू शेट्टींनी केंद्रात मोदींसोबत हात मिळवणी केली. तर सदाभाऊ खोत यांना राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात पद देण्याचा निर्णय झाला. पण त्यासाठीही सदाभाऊंना काही महिने वाट पहावी लागली. अखेर त्यांना कृषी व पणन राज्यमंत्री पद मिळाले. मंत्री पद मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी त्यांनी झटुन काम करण्यास सुरवात केली. त्यांची कामाची पध्दत पाहून मुख्यमंत्र्यांनीही त्यांना जवळ केले. पण हे राजू शेट्टींना पटले नाही. तेथूनच त्यांचे व सदाभाऊंमध्ये खटके उडण्यास सुरवात झाली. 

दरम्यान, त्यांच्या मागे आजारपण लागले. सर्व प्रकारचे उपचार करून पाहिले, अगदी साताऱ्यातील निसर्गोपचारही त्यांनी केले. त्रास थोडाफार कमी झाला. तोच त्यांच्या मुलाचा अपघात झाला. यातून कसेबसे सावरले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या. त्यांनी आपल्या मुलाला निवडणुकीसाठी उभे केले. पण त्यांच्या मंत्री पदाची पोच मुलाला या निवडणुकीत विजयी करू शकली नाही. मुलाच्या पराभवामुळे सदाभाऊ खचून गेले. एक झाले की दुसरे संकट अशी संकटांची मालिका सदाभाऊ झेलत, त्याला तोंड देत पुढे जात होते. यानंतर राजू शेट्टी व त्यांच्यातील वाद वाढला. बघता-बघता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फुट पडली. 

एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सरकारवर तुटून पडणारे स्वाभिमानीचे दोन नेते एकमेकांवरील आरोपात व्यस्त झाले. पुढे राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीसमोर सदाभाऊंना उभे करण्याची तयारी केली. पण सदाभाऊंनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. शेवटी स्वाभिमानीतून बाजूला होताना आपल्यावर गंभीर आरोप होऊ नयेत याची त्यांना चिंता आहे. या संकटाशी दोन हात करत असतनाच एका महिलेने त्यांच्याविरोधात आरोप केले. अन्‌ सदाभाऊ पुन्हा यानिमित्ताने चर्चेत आले. सदाभाऊ मंत्री झाल्यापासून विविध संकटे त्यांची पाठ सोडेना झालीत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी ते धडपडत आहेत. पण ते मुक्त होण्यासाठी त्यांना कोणत्या संकटमोचनाची प्रतिज्ञा करावी लागणार, असा प्रश्‍न आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com