भाजपला क्रमांक एकची पसंती पण दोन्ही काॅंग्रेसच्या आघाडीलाही कौल

भाजपला क्रमांक एकची पसंती पण दोन्ही काॅंग्रेसच्या आघाडीलाही कौल

पुणे : या सरकारला घरी पाठविण्याची महाराष्ट्रातला मतदार वाट पाहतोय. दुष्काळ आणि एकूणच गेल्या चार वर्षांतील कारभार यामुळे या सरकारविरोधातील असंतोष रोज वाढतो आहे, अशी टीका काॅंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली. तर हे सरकार अतिशय गतिमान कारभार करत असल्याची भूमिका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मांडली. सरकारनामाने केलेल्या महासर्वेक्षण २०१८ यावर साम वाहिनीवर झालेल्या चर्चेत ते बोलत होते. 

शिवसेनेच्या नेत्या आमदार डाॅ. नीलम गोऱ्हे, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, सकाळचे संचालक संपादक श्रीराम पवार, संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, नाशिक सकाळचे संपादक श्रीमंत माने आदी या चर्चेत सहभागी झाले होते. 

सरकारच्या एकूण कारभाराविषयी नाराजीचा कल असला, तरी "आज निवडणूक झाली तर कोणाला मत द्याल`, या प्रश्नाला उत्तर देताना सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सर्वाधिक म्हणजे 28 टक्के मतदारांचा कौल भारतीय जनता पक्षाला आहे. शेतकरी मतदार वगळता सर्वांनीच भाजपला पहिल्या क्रमांकाची पसंती दिली आहे. लोकप्रियतेमध्ये भाजपच्या खालोखाल कॉंग्रेस (25 टक्के), राष्ट्रवादी कॉंग्रेस (24 टक्के), शिवसेना (17 टक्के), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (2 टक्के) आणि अन्य पक्ष (5 टक्के) अशी क्रमवारी आहे. भाजपला मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीत फरक पडलेला नाही, असा सर्वसाधारण अर्थ या टक्केवारीतून काढता येईल.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपची मतांची टक्केवारी 27.8 एवढी होती. पुरुष आणि महिला मतदारांमध्ये, तसेच 18 ते 45 वयोगटातही भाजपला कौल देणाऱ्या मतदारांची संख्या 28 टक्केच आहे. शिवसेना आणि कॉंग्रेसला तुलनेने महिला मतदारांची पसंती अधिक - अनुक्रमे 18 आणि 27 टक्के - अधिक आहे. "मनसे'च्या बाजूने मत नोंदवणाऱ्यांमध्ये मतदारांमध्ये मात्र पुरुष मतदारांच्या तुलनेत (3 टक्के) महिला मतदारांची (2 टक्के) संख्या कमी आहे.

पाटील यांच्या म्हणण्यानुसार या सरकारच्या कारभारावर कोण खूष आहे? दुष्काळ, आरक्षण, शिक्षण, महागाई या सर्व प्रश्नांवर जनतेची फसवणूक झाली आहे. मोठ्या अपेक्षेने हे सरकार निवडून दिले. पण जनतेचा त्यात भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे हे सरकार घालविण्याची वाट जनता पाहत आहे. या सर्वेक्षणात दोन्ही काॅंग्रेसची आघाडी झाली तर जनतेचा कौल मिळेल, असे स्पष्ट दिसते आहे.

उपाध्ये यांनी हे सरकार अनेक प्रश्नांवर गतिमान निर्णय घेत असल्याचा दावा केला. आधीच्या काॅंग्रेस सरकारने गेली १५ वर्षे करून ठेवलेले नुकसान भरून काढण्याचे काम या सरकारला करावे लागले. शिवस्मारक, आरक्षण हे रेंगाळलेले प्रश्न आम्ही मार्गी लावले. त्यामुळे भाजपला सर्वाधिक पसंती या सर्वेक्षणात दिसून आली आहे.

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की दोन्ही काॅंग्रेसचे नेते सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण करण्याचे काम करत आहेत. मात्र त्यांची यंत्रणा खिळखिळी झाली आहे. या दोन्ही काॅंग्रेसच्या कारभाराचा जनतेने अनुभव घेतला असून, त्यांच्या कारभाराचे चटके जनतेने सहन केले आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे जनतेच्या हिताचे निर्णय व्हावेत यासाठी स्वतः प्रयत्नशील असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com