'समृध्दी'च्या गावांत गुप्तचरांची नजर : राजकारणामुळे "समृध्दी'चे दर तिप्पट

'समृध्दी'च्या गावांत गुप्तचरांची नजर : राजकारणामुळे "समृध्दी'चे दर तिप्पट

नाशिक - मुंबई- नागपूर समृध्दी महामार्गावरुन सत्ताधारी घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षाकडून विरोधाचे राजकारण सुरु आहे. या दबावामुळे काल शासनाने नाशिकच्या 49 गावांतील जमिनींचे दर थेट तिप्पट केले आहेत. एकरी 40 ते 85 लाख रुपये भाव जाहीर झाले असले तरी शेतकऱ्यांची नकारघंटा कायम आहे. त्यामुळे गावोगावी आंदोलनातील राजकीय नेते, शेतकऱ्यांवर गुप्तचर विभागाने नजर ठेवणे सुरु केल्याने वेगळेच राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

समृध्दी महामार्ग हा रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील प्रकल्प आहे. मात्र, संपादित जमिनींचे दर जाहीर करण्याची घोषणा जिल्हाधिकारी राधाकृष्णन व जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या उपस्थितीत झाली. यापूर्वी थेट वाटाघाटीद्वारे जमिनी संपादत करण्याची अधिसूचना शासनाने परस्पर वर्तमानपत्रांत जाहीर केली होती. जिल्ह्यातील 1291 हेक्‍टर जमिन या प्रकल्पासाठी हवी आहे. त्यातील 1114 हेक्‍टरची मोजणी पूर्ण झाल्याचा दावा शासनाने केला आहे. त्याला सर्व स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याने पर्याय म्हणून माळशेज घाटातून किंवा अन्य पर्यांयाचा वापर करुन हा महामार्ग करावा अशी सुचना आहे.

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने त्यासाठी सर्वच यंत्रणा पारंपरिक नियम व प्रशासकीय संकेत बाजूला ठेऊन कामाला लागेली आहे.  यासंदर्भात स्थानिक कृती समितीकडून सातत्याने विरोध सुरु आहे. शेतकरी कृती समितीने त्याविरोधात आंदोलन केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही त्याला प्रखर विरोध केला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचे आमदार त्यासाठी आक्रमक भूमिका घेतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे बाधित शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे या विषयावरील राजकारण तापले असल्याने मुख्यमंत्री विरुध्द सगळे असे चित्र होते. त्यात मोबदल्याचे तिप्पट भाव जाहीर करुन फडणवीस यांनी नवा डाव टाकला आहे. जास्त भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांच्या विरोधाची धार कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र अद्याप तरी तसे संकेत मिळालेले नाहीत.

आज साकळी सोनारी (ता. सिन्नर) येथे या आदेशाची होळी करण्यात आली. त्यामुळे आता त्यावर गुप्तचर विभाग व साध्या वेषातील पोलिस जमिन संपादीत होणाऱ्या गावांत तळ ठोकून आहेत. त्याचा सातत्याने अहवाल दिला जात असून वरिष्ठांना माहिती  दिली जात आहे. त्याचे 'इनपुट' थेट मुख्यमंत्री कार्यालयास दिले जात असल्याने 'समृध्दी'चे काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com