ज्या दिवशी निवडणुकीसाठी लोकवर्गणी बंद होईल त्यादिवशी घरी बसेन : राजू शेट्टी 

ज्या दिवशी निवडणुकीसाठी लोकवर्गणी बंद होईल त्यादिवशी घरी बसेन : राजू शेट्टी 

पुणे : पहिल्या निवडणुकीपासून लोक वर्गणीतून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे जोपर्यंत लोक वर्गणी देऊन मला निवडणुकीला उभे करीत आहेत तोपर्यंत मी लढत राहणार आहे. कुणी कितीही जातीचा प्रचार केला तरी माझ्या मतदारसंघातील लोक जात पाहून मत देत नाहीत. त्यामुळे जातीवादी प्रचाराची भीती मला कधीच नव्हती आणि आताही नाही, असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज पुण्यात सांगितले. 

शेट्टी यांच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील त्यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची व शेट्टी यांच्याशी कोल्हापूर येथे भेट झाली. या भेटीनंतर राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असलेल्या माने कुटुंबाने शिवसेनेशी तत्काळ जवळीक साधत राष्ट्रवादीला रामराम केला. 

माने यांचा शिवसेना प्रवेश आणि या मतदारसंघात असलेल्या शिवसेनेच्या चार आमदारांमुळे शेट्टी यांना निवडणूक जड जाईल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना शेट्टी यांनी विजयाचा विश्‍वास व्यक्त केला. 

ते म्हणाले, "" ज्या दिवशी निवडणुकीसाठी होणारी लोकवर्गणी बंद होईल त्या दिवशी मी निवडणुकीला उभा राहणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या जातीयवादी प्रचाराची भीती मला वाटत नाही. खासदारकीच्या गेल्या दोन्ही निवडणुका तसेच त्याआधीच्या आमदारकीच्या निवडणुकीत मला लोकांनी वर्गणी काढून उभे केले होते. येत्या लोकसभा निवडणुकीतही लोकवर्गणीच्या माध्यमातूनच मी निवडणूक लढणार आहे.'' 
---- 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com